तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा; आता काँग्रेसची जोरदार मागणी

| Updated on: Sep 26, 2022 | 2:25 PM

तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी.

तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा; आता काँग्रेसची जोरदार मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation) केलेलं वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांना चांगलंच भोवताना दिसत आहे. सावंत यांच्या या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. सावंत यांच्या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तानाजी सावंत यांनी खुलासा करावा. तसेच सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून त्यावर सरकारने खुलासा केला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. 2014 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, असं त्यांनी सांगितलं.

सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघडवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती, असं त्यांनी सांगितलं.

तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.