अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर 7 दिवस कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे, पाटलांची सूचना

उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी 8 दिवस तिथं जाऊन राहावं. तिकडे वातावरणही चांगलं आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही, असं पाटील म्हणाले.

अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर 7 दिवस कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे, पाटलांची सूचना
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
| Updated on: May 22, 2021 | 3:12 PM

पुणे : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘धावता’ दौरा करुन नुकसानाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या दौऱ्यावरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका सुरु केलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक सल्ला देऊ केलाय. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी 8 दिवस तिथं जाऊन राहावं. तिकडे वातावरणही चांगलं आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला हाणलाय. (Chandrakant Patil’s advice to CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar)

आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सो चुहे खाकर बिल्ली चली हज को. आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा, अशा शब्दात पाटील यांनी अजितदादांना टोला लगावलाय. इतकंच नाही तर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. 3 तासात पाहणी होत नाही. अजित दादांनीही 8 दिवस कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, असंही पाटील यांनी म्हटलंय.

‘संजय राऊत विद्वान, ते काहीही बोलू शकतात’

विधान परिषदेच्या 12 जागांच्या नियुक्तांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. त्यावर संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत विचारलं असता, संजय राऊत काहीही म्हणू शकतात, ते फारच मोठे विद्वान आहेत. हे प्रकरण कोर्टात आहे. त्यावर मी बोलू शकणार नाही, असं उत्तर पाटील यांनी दिलंय. दुसरीकडे पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुरु आहे. तसंच काल डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुनही विरोधक मोदींवर टीका करत आहेत. त्यावर बोलताना राजकारणाची पातळी खालावली आहे. या देशात काही परंपरा आहेत. एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करायची योग्य नाही. पण मोदींना त्याने काही फरक पडत नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

‘कोणत्याही राज्यासोबत पंतप्रधानांचा भेदभाव नाही’

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले, पण महाराष्ट्रात आले नाही. मोदींनी महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. मोदींनी महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही, असं सांगतानाच मोदींनी तौक्ते वादळात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक राज्यातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा काही नेत्यांना महारोग; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

एकनाथ शिंदेंचं कौतुक, त्यांनी मदत तरी केली, उद्धवजी कपड्याची इस्त्री न मोडता कोकणातून परतले,भाजपचे टोमणे

Chandrakant Patil’s advice to CM Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar