मुंबई : मेट्रो (Mumbai Metro) कारशेडच्या कामामुळे मानखुर्दजवळ महाराष्ट्र नगरमधील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे लोकांना त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. हा रस्ता बांधून देण्याचे आश्वासन MMRDA मेट्रो प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शिवसनेचे आमदार तुकाराम काते (Tukaram Kate) यांनी चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले आहे.
“मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर या ठिकाणी 100 एकर परिसरात मेट्रो कारशेड उभारले आहे. मात्र या कारशेडला महाराष्ट्र नगरच्या रहिवाश्यांनी सुरुवातीपासून विरोध केला होता. सुरुवातीला गटाराची लाईन आणि रस्ता व्यवस्थित बांधून द्या त्यानंतर मेट्रो कारशेडचे काम सुरु करा असा पावित्रा या ठिकाणच्या स्थानिकांनी घेतला होता. त्यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी रस्त्याचे व इतर काम लवकरात लवकर पूर्ण करुन देऊ असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप MMRDA प्रशासनाने हा रस्ता बनवलेला नाही,” अशी माहिती तुकाराम काते यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
विशेष म्हणजे हा रस्ता बनवण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणच्या रस्त्यावर चिखल टाकण्यात आला. त्यामुळे सद्यस्थितीत या रस्त्याची अक्षरश: दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून आजूबाजूला सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना या जाता-येताना चिखलाचा सामना करावा लागतो. हा रस्ता बांधून देण्याचे आश्वासन MMRDA प्रशासनाने दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने तुकाराम काते चक्क रस्त्यावर उतरले आहेत.
त्यांनी मेट्रो कारशेडच्या गेट समोरील रस्त्यामधील चिखलात बसले आणि ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र नगरची रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत आणावा अशी मागणी तुकाराम काते यांनी यावेळी केली. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते.