12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप?

| Updated on: Jan 28, 2022 | 5:03 PM

सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.

12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप?
केशव उपाध्ये, उर्मिला मातोंडकर
Follow us on

मुंबई : विधानसभेतील भाजपच्या 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिलाय. विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याच्या कारणावरुन या आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायायलयाने आज अखेर आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्यात ट्वीटरवर जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

विधानसभेतील 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. ‘सत्यमेव जयते! राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करीत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्याचा प्रकार मविआ सरकारकडून होत होता, त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक. लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात, आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले’.

‘हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या 12 आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो! कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो.आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

उर्मिला मातोंडकरांकडून 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित

फडणवीसांच्या या ट्वीटचा धागा पकडत उर्मिला मातोंडकर यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा उपस्थित केला. ‘अभिनंदन! आनंद आहे “लोकशाही” वाचली याचा. पण अध्यक्षमहोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा.इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे. *शोभेकरता… शोभा पण लाजली वाटतं’, असं खोचक ट्वीट केलं आहे.

केशव उपाध्ये यांचा मातोंडकरांना टोला

मातोंडकर यांच्या ट्वीटला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलंय. ‘थोडी माहिती घ्या आपलं वाचन चांगलं आहे असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय तर त्यासाठी लोकं न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही’, असं ट्वीट उपाध्ये यांनी केलं.

उर्मिला मातोंडकरांचं उपाध्येंना प्रत्युत्तर

त्यानंतर मातोंडकर यांनी उपाध्ये यांनाही प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. ‘अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच “आनंद/अभिनंदन”. पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे “वडाची साल” ऐवजी “आपला तो बाब्या” जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही’, असं मातोंडकर म्हणाल्या आहेत.

इतर बातम्या : 

कृत्रिम बहुमताने मिळालेली सत्ता आघाडीच्या डोक्यात गेल्याने हम करे सो कायदा वागत होते-चंद्रकांत पाटील

Maharashtra Mla Suspension: महाविकास आघाडीला कोर्टाची सणसणीत चपराक, सत्यमेव जयते!; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया