कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत, दोन अपक्षांनी पाठिंबा काढला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

बंगळुरु : भाजपने कर्नाटकात ऑपरेशन कमळ मनावर घेतल्याचं दिसतंय. काँग्रेस बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातच दोन अपक्षांनी पाठिंबा काढल्याचं पत्र दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार अडचणीत आलंय. कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सत्ता स्थापन केली होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला होता. अपक्ष आमदार […]

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत, दोन अपक्षांनी पाठिंबा काढला
Follow us on

बंगळुरु : भाजपने कर्नाटकात ऑपरेशन कमळ मनावर घेतल्याचं दिसतंय. काँग्रेस बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातच दोन अपक्षांनी पाठिंबा काढल्याचं पत्र दिलंय. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार अडचणीत आलंय. कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला असताना काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सत्ता स्थापन केली होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला होता.

अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देणार

राज्यात स्थिर सरकार असावं यासाठी जेडीएस-काँग्रेसला पाठिंबा दिला होता. पण हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचा आरोप करत या आमदारांनी पाठिंबा काढलाय. अपक्ष आमदार एच नागेश आणि आर शंकर यांनी पाठिंबा काढण्याची घोषणा करत याबाबतचं पत्रही राज्यपालांना पाठवलंय.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आम्हाला नवा बदल हवाय. आम्ही कुमारस्वामी यांच्यावर नाराज आहोत, असा आरोप अपक्ष आमदारांनी केलाय. काही वृत्तांनुसार, हे दोन्ही आमदार भाजपला पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी साथ सोडल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात

कर्नाटकमधील काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. यापैकी चार जण मुंबईत आहेत. महाराष्ट्राला लागून असलेल्या मतदारसंघातील दोन आमदारही यात आहेत. या चार आमदारांच्या संपर्कात आणखी सहा ते सात आमदार आहेत. आमचे आमदार मुंबईत फिरायला गेलेत, असं काँग्रेसकडून कर्नाटकात सांगण्यात येत आहे.

कर्नाटकात या वृत्तांनंतर राजकीय अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितलंय. भाजपनेही घोडेबाजाराच्या वृत्तांचं खंडण केलंय. पण सूत्रांच्या मते, येत्या चार दिवसात कर्नाटकमध्ये भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.

भाजपचे आमदार दिल्लीत

कर्नाटकातील भाजपच्या 104 पैकी 101 आमदार दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकची आढावा बैठक सुरु असल्याचं सांगितलं जातंय. काँग्रेसच्या आमदारांना जसा धोका आहे, तसाच धोका भाजपच्या आमदारांना असल्याचं सांगितलं जातंय. म्हणूनच भाजपनेही खबरदारी घेतली आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी म्हटलंय.

काय आहे भाजपचा प्लॅन?

काही वृत्तांनुसार, 16 जानेवारीनंतर कर्नाटकात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे बीएस येदीयुरप्पा अवघ्या दीड दिवसांचे मुख्यमंत्री ठरले होते. शिवाय 2006 मध्येही कुमारस्वामी यांनी दगाफटका केल्यामुळे येदीयुरप्पा यांचं सरकार कोसळलं होतं. भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वीच या सगळ्याचा बदला घेणार आहे. भाजपच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार देतील, ज्यामुळे बहुमताचा आकडा 104 वर येईल. भाजपकडे अगोदरच स्वतःचे 104 आमदार आहेत. शिवाय दोन अपक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो.