निजामशहा, अदिलशहा …. नेमका उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा संबंध कुणाशी जोडला?

उद्धव ठाकरे यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भाजपा यांच्यावर कसा निशाणा साधला त्याचे विस्तृत मुद्दे बातमीत वाचा...

निजामशहा, अदिलशहा .... नेमका उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा संबंध कुणाशी जोडला?
| Edited By: Jaywant Patil | Updated on: Sep 21, 2022 | 10:56 PM

मुंबई : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही सोडलेले नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सध्याचे विरोधक टीका करताना दिसत नाही, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका प्रकर्षाने विरोधक टाळताना दिसतात, पण आज उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर खास निशाणा साधला आहे, एवढंच काय तर त्यांचं कुळ काढलं, अमित शहा हे निजामशहा, अदिलशहा यांच्या कुळातले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांची तुलना थेट मुस्लीम राज्यकर्त्यांशी केली. उद्धव ठाकरे यांचा आजच्या भाषणाचा अंदाज अतिशय आक्रमक होता.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नेहमीप्रमाणे नको त्या शब्दांची गर्दी दिसून आली नाही, तर थेट निशाणा साधताना उद्धव ठाकरे दिसत होते. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि भाजपा यांच्यावर कसा निशाणा साधला त्याचे विस्तृत मुद्दे खाली वाचा…

अमित शहा यांची तुलना मुस्लीम शासकांशी

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटलंय, निजामशहा आले, अदिशहा आले आणि गेले हे शहा देखील त्यांच्याच कुळातले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांची तुलना भाषणात मुस्लिम शासकांशी केली.

अमित शहा यांना आव्हान

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, अमित शहा यांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटे येथे बसलेले असतील, तर त्यांना सांगा, महिन्याभरात मुंबई महापालिका, आणि राज्याची विधानसभा निवडणूक घ्या, आणि हिंमत असेल तर जिंकून दाखवा.

मुंबई तुमच्यासाठी विकण्यासाठी जमीन असेल…

भाजपाच्या मुंबईविषयी धोरणावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई तुमच्यासाठी विकण्यासाठी जमीन असेल, पण मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे, निवडणूक आल्यावर भाजपाला मुंबई आठवते. मुंबई पिळायची, मुंबई गुलाम करायची हे धोरण आहे.

बाळासाहेब आणि कमळाबाई

बाळासाहेबांनी भाजपाला कमळाबाई शब्द दिला होता, कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय? मुंबईतलं आर्थिक केंद्र गुजरातला पळवलं, का मुंबईकर शिवसेनेवर विश्वास टाकतात, गेली २० ते २५ वर्ष मुंबईकर आपलं आयुष्य शिवसेनेच्या हाती सोपवतं. मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना धावून येते.

पुन्हा एकदा सांगतो

पुन्हा एकदा सांगतो शिवसेनेची भाजपासोबतची २५ वर्षाची युती सडली. मुंबई झुकणार नाही, मुंबई वाकणार नाही. मुंबईत १५ दिवसात कोव्हिड सेंटर उभे केले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा फक्त मुंबईत आहेत.

माणसं धुवायची लॉन्ड्री

भाजपानं माणसं धुवायची लॉन्ड्री काढली का? ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांना भाजपाने पक्षात घेतलं. चित्ते डरकाळी फोडत नाहीत, म्याव करतात, ढोकळा खायला हे सुरतला गेले, आमचा वडापावचा ठेचा गरम लागला.

का मुंबईकर शिवसेनेवर विश्वास टाकतात

का मुंबईकर शिवसेनेवर विश्वास टाकतात, गेली २० ते २५ वर्ष मुंबईकर आपलं आयुष्य शिवसेनेच्या हाती सोपवतं. मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना धावून येते, २६ जुलै २००५ च्या पुरातही शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.

मुंबई झुकणार नाही, वाकणार नाही

मुंबई बळकवायची आहे, मुंबई गिळायची आहे, लचका तोडू देणार तुम्ही मुंबईचा?. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आस्मान दाखविल्याशिवाय दिसणार, मुंबई झुकणार नाही, वाकणार नाही.

आमच्यातल्या गोचीड निघून गेल्या, बरे झाले

शिवसेनेला बदनाम कर, शिवसेना संपवा, हेच चाललंय, सगळे मिळून या तुम्हाला आस्मान दाखवतो. साचलेलं डबकं, मोकळं झालं आहे, आमच्यातल्या गोचीड निघून गेल्या, बरे झाले.

हे माझं ठाकरे कुटुंब आहे, या संपवून दाखवा

सभेतील गर्दीकडे हात दाखवून उद्दव ठाकरे म्हणाले, हे माझं ठाकरे कुटुंब आहे, या संपवून दाखवा, या सर्वांच्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, जर संघर्ष झाला, रक्तपात झाला, रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाई शाबूत राहिल, पण भाजपाचा हा डाव यशस्वी होवू देणार नाही.

ही पहिली निवडणूक आहे, म्हणून लढणार

देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातली ही सर्वात शेवटची निवडणूक असेल, आमच्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक आहे, म्हणून लढणार, कामाला लागा. तपास यंत्रणा शाह आणि आपले गद्दार त्यांच्यासोबत आहेत.

मुस्लिम लोक देखील शिवसेनेसोबत

मतांसाठी आज हिंदू-मुस्लीम भेदभाव करुन पाहा, काहीही करुन पाहा, मुस्लिम लोक देखील आज शिवसेनेसोबत आहेत.कोव्हीड काळात कोणतीही जातपात धर्म न पाहाता काम केलं आहे.

Follow Us