‘इतके वर्ष स्वत:सकट स्वत:ची पिलावळ…’; ठाकरेंची कोकणात जावून राणेंवर खोचक शब्दांत टीका
"कोकण हा सुसंस्कृत आहे. देवेंद्र फडणवीस काल कोकणात येऊन गेले. म्हणाले, यांना मत म्हणजे त्यांना मत. म्हणजे दोघांचं साटंलोटं झालं, कोकणात त्यावेळी शिवसेना उभी राहिली नसती, तर आज कोकणात गुंडाराज चालू असतं. मग तुम्हाला कोकणात परत गुंडाराज पाहिजे?", असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. “विनाशकाली विपरीत बुद्धी. हा नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत, त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केले. त्यांचा विनाश होतोय, तुम्ही त्यांच्यासोबत नका राहू, अबकी बार भाजप तडीपार करुन टाका. कांदा निर्याद बंदी केली आहे. आधी भाजपवर निर्यातबंदी करुन टाका. त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरुन धनुष्यबाण चोरलं. मला विनायक राऊत, राजन विचारे, भास्कर जाधव, वैभव नाईक तुमचा अभिमान आहे. कारण समोर जो उभा आहे, त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतो, डोकं खाजवतो तेव्हा, कारण टोप घातल्यावर खाजवता येत नाही. तेव्हा खाजवून विचारतो की, आपण आज कोणत्या पक्षात आहोत? कारण आठवतंच नाही की, आपण कोणत्या पक्षात आहोत? इतके वर्ष स्वत:सकट स्वत:ची पिलावळ, जिकडे सत्ता असते तिकडे तुम्ही झुकता, सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारकी-खासदारकी केल्या, एकतरी लघू किंवा सुक्ष्म एकतरी प्रकल्प आणला का? भाजप हुशार आहे, त्यांनी बरोबर तुमच्या कुवतीप्रमाणे लघू आणि सुक्ष्म दिलं”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणतील. अतिसुक्ष्म म्हणजे कोरोनाचा जीवाणू दिसेल, पण हे नाही दिसणार. एवढे हे सुक्ष्म होतील. पण मस्ती किती? तुम्ही आज गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपायला निघालात? अहो अनेक वर्ष हे सगळे जीवाला जीव देणारे शिवसैनिक बाळासाहेबांनी जोडून दिले आहेत. हे माझं वडिलोपार्जित वैभव आहे. मोदी तुम्ही म्हणत आहात, ही घराणेशाही आहे. आमची घराणेशाही या लोकांना मंजूर आहे. पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही. तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावता. नालायक माणसं सगळी, अंगात कर्तृत्व नाही. तुम्ही माझी शिवसेना, धनुष्यबाण, माझे वडील चोरत आहेत. कर्तृत्वशून्य माणसं आहेत. तुम्हाला गद्दार आणि गुंडांची घराणेशाही चालते हे दु:ख अटलींना वाटत असेल”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.
‘तर आज कोकणात गुंडाराज चालू असतं’
“कोकण हा सुसंस्कृत आहे. देवेंद्र फडणवीस काल कोकणात येऊन गेले. म्हणाले, यांना मत म्हणजे त्यांना मत. म्हणजे दोघांचं साटंलोटं झालं, कोकणात त्यावेळी शिवसेना उभी राहिली नसती, तर आज कोकणात गुंडाराज चालू असतं. मग तुम्हाला कोकणात परत गुंडाराज पाहिजे? कल्याणमध्ये जे घडलं, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अनेकदा आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली, हे बघा काय चाललंय, कुणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्वीग्न झाला, त्यांच्या मुलाला पोलीस ठाण्यात मिंधेंच्या मुलांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काही करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या. त्यांना म्हटलं आहे की, जोपर्यंत या मिंधेंच्या हातात सत्ता राहील तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडांचं राज्य राहील. ते आज जुलूम जबरदस्तीने कारभार करु इच्छित आहेत”, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.