Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा छळ केला, नारायण राणेंचा सणसणाटी आरोप, वारसा विचाराने नसतो का?

| Updated on: Jul 26, 2022 | 7:00 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला, त्यांचा छळ गेला, असा सणसणाटी आरोप राणेंनी केलाय. तसंच वारसा फक्त रक्ताचा असतो का? विचाराचा वारसा नसतो का? असा सवालही राणेंनी यावेळी केलाय.

Narayan Rane : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा छळ केला, नारायण राणेंचा सणसणाटी आरोप, वारसा विचाराने नसतो का?
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना छळलं, राणेंचा आरोप
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी (Sanjay Raut) घेतलेली मुलाखत आज प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे यांनी भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. हिंमत असेल तर शिंदेंनी बाळासाहेबांचं, माझ्या वडिलांचा फोटो आणि नाव वापरु नये, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलंय. त्या मुद्द्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला, त्यांचा छळ गेला, असा सणसणाटी आरोप राणेंनी केलाय. तसंच वारसा फक्त रक्ताचा असतो का? विचाराचा वारसा नसतो का? असा सवालही राणेंनी यावेळी केलाय.

‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना छळलं’

नारायण राणे म्हणाले की, ‘माझे वडील, माझा वारसा आहे. वारसा रक्तानेच असतो का? विचाराने नसतो? साहेबांचे किती विचार आत्मसात केले आणि किती अमलात आणले सांगावं त्यांनी. साहेबांना किती प्रेम दिलं, किती सहवास दिला? त्याच्या अधिकपटीने दु:ख दिलंय, त्रास दिला. एक दिवस क्रमवार यांनी दिलेला त्रास मला सांगावा लागेल. छळलं अक्षरश: आणि आज मोठा साहेब साहेब म्हणतो. याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे हे नाव काढलं तर मोठं शून्य म्हणजे उद्धव ठाकरे. माझ्या वडिलांचा फोटो चोरता, माझ्या वडिलांचं नाव चोरता… काय बोलतो वडिलांबद्दल? ते आमचं दैवत. त्या वेळेला साहेब असताना त्यांचं काही ऐकलं नाही. पण आम्ही साहेब सांगतील ते ऐकत गेलो. हे तू केलंस का? अशी प्रश्नांची सरबत्तीच राणेंनी केलीय.

‘दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकरेला विचारण्याची गरज नाही’

तसंच ‘शिवसेना उभी करताना जी ताकद मी वापरली ती माझा जीव वाचवताना वापरणार नाही का? तू कोण आहेस? आम्ही शिवसेना अशी आणून दिली म्हणून अडीच वर्ष बसला. आमची 50 वर्षाची मेहनत, घर पाहिलं नाही, कुटुंब पाहिलं नाही, मुलं, आई-वडील पाहिले नाहीत. पण साहेबांच्या नखालाही धक्का लागू दिला नाही. तिकडे लोणावळ्याला साहेबांच्या जीवाला धोका होता. साहेबांनी तुला बरोबर नाही घेतलं. तुझी माणसं साहेब नाही बोलले. मला साहेब म्हणाले आपल्याला जायचं आहे, अमुक वाजता ये. लोणावळ्याला जाऊन राहिलो. तुम्ही कुठे होता? रात्र जागवल्या आम्ही, साहेब बंगल्यात झोपायचे आम्ही रस्त्यावर गाडी लावून पाहारा केलाय. साहेबांचं नाव घेण्याचा आमचा अधिकार आहे आमचे वडील नसले तरी. आमचं दैवत आहे आणि दैवताचं नाव घेताना उद्धव ठाकरेला विचारण्याची गरज नाही. तू काय दिलं वडिलांना मनस्ताप, संताप, त्रास. त्यांचं स्वास्थ्य बिडण्याचं कारण हा उद्धव ठाकरे आहे. घरातून पळून गेला, दोन वेळा पळून गेला. विचारा त्यांना कुणी परत आणलं, या नारायण राणेने परत आणलं आणि आमचं घर तोडायला खोटे नाटे आरोप करुन. लाज वाटायला हवी’, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय.

‘संजय राऊत मनातून खूश असेल’

राणे यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधलाय. संजय राऊतने पहिलं काम केलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करणे. आता त्यांच्या जमखेवर मिठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे. संजय राऊत मनातून खूश आहे की मी विजयी ठरलो. माझ्या गुरूने, पवारसाहेबांनी दिलेलं काम करण्यात मी यशस्वी ठरलो, असा टोला राणेंनी राऊतांना हाणलाय.