Vidhan Parishad Election : मलिक, देशमुखांना मतदानाचा अधिकार नाहीच, महाविकास आघाडीला “सुप्रीम” दणका

| Updated on: Jun 20, 2022 | 4:04 PM

सुप्रीम कोर्टाने मलिक आणि देशमुख यांची याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टाने आणखी एक मोठा दणका देत या दोघांना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. हे दोघेही सध्या वेगवगळ्या प्रकरणात जेलमध्ये आहेत.

Vidhan Parishad Election : मलिक, देशमुखांना मतदानाचा अधिकार नाहीच, महाविकास आघाडीला सुप्रीम दणका
अनिल देशमुख, नवाब मलिक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) दहा जागांसाठी मतदान पार पडतंय. अशावेळी महाविकास आघाडीला मोठा झटका बसलाय. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मलिक आणि देशमुख यांची याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टाने आणखी एक मोठा दणका देत या दोघांना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. हे दोघेही सध्या वेगवगळ्या प्रकरणात जेलमध्ये आहेत.

यापूर्वी राज्यसभा निवडणुकीतही मलिक आणि देशमुख यांना मतदान करता आलं नव्हतं. त्यावेळीही न्यायालयाने त्यांना मतदानाचा अधिकार नाकारला होता. त्यानंतर लागलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी मलिक आणि देशमुखांकडून उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. तिथेही त्यांना कोर्टाने दणका दिला होता. त्यानंतर आज या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे ऐन मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीला हा मोठा झटका आहे. 

भाजपचा पाचव्या जागेवर विजयाचा दावा

एक लाख टक्के दावा आहे, विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून येईल. भाजपाची पाचवी जागा इतरांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, असा दावा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी हा दावा केला आहे. दहा उमेदवारांमधून आमचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून येईल. तर राज्यसभेपेक्षा हा मोठा विजय असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

थोरात, चव्हाण, बंटी पाटील फडणवीसांना भेटले!

दरम्यान, आज विधान भवनाच्या लॉबीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत बंब आदींसह एकिकडून येत होते. त्यांच्या समोरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज (बंटी) पाटील आले. यावेळी फडणवीसांनी दिलखुलासपणे हसत विनोद केला. तीन मतदार फुटले, असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेस बंटी पाटलांनीही फडणवीसांचं वाक्य खाली न पडू देता… तो मी नव्हेच.. असं म्हटलं. फडणवीसांनीही पाटलांना दाद देत.. अरे हो.. हा नव्हेच.. असे म्हणत पाठ थोपटली… विधान भवनात टिपलेलं हे अत्यंत बोलकं दृश्य आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आहे.