पवारांना ऊसासाठी पाणी हवंय, आम्हाला पिण्यासाठी : रणजितसिंह नाईक

| Updated on: Jun 10, 2019 | 6:46 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलाय. माझ्या टर्ममध्ये हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा निंबाळकर यांनी केला. ते (शरद पवार) ऊसाचा विचार करत आहेत, मात्र आम्ही पिण्यासाठी पाणी मागतोय, असंही निंबाळकर यांनी म्हटलंय.

पवारांना ऊसासाठी पाणी हवंय, आम्हाला पिण्यासाठी : रणजितसिंह नाईक
Follow us on

पुणे : निरा डावा कालव्यातून बारामतीला दिल्या जाणाऱ्या 60 टक्के पाण्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. या पाण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुण्यात जलसिंचन भवनला भेट देऊन वस्तूस्थितीची माहिती घेतली. कार्यकारी संचालकांची तब्येत खराब असल्याने सरकारला शिफारस झाली नव्हती. मात्र आज शिफारस केली जाणार असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलाय. माझ्या टर्ममध्ये हा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा निंबाळकर यांनी केला. ते (शरद पवार) ऊसाचा विचार करत आहेत, मात्र आम्ही पिण्यासाठी पाणी मागतोय, असंही निंबाळकर यांनी म्हटलंय.

निरेचं पाणी माढ्याला जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. करार संपल्यानंतरही 60 टक्के पाणी बारामतीला दिलं जातंय. पण हे आता माढ्यातील दुष्काळी भागाला वळवलं जाणार आहे. निरा धरणाचे कालवे जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. राज्यातील एकमेव धरणाचे कालवे झाले नाही. कालवे झाले नाही म्हणून बारामतीला पाणी दिल्याचा आरोप रणजितसिंहांनी केला. शिवाय यासाठी अधिकाऱ्यांनीही कधी प्रयत्न केला नाही, असं ते म्हणाले.

निरा देवधर पाण्यासाठी भाजपात प्रवेश केलाय. पवार कुटुंबीय हे बारामतीसाठी सिंचन भवनला प्रथमच आले होते. पवारांनी राजकारण करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म जलसिंचन करावं, असा सल्ला रणजितसिंहांनी दिला.

निरा डावा कालव्यातून 7 टीएमसी पाणी बारामतीला वळवलं तर आमच्याकडे 4 टीएमसी होतं, आता आमच्या हक्काचं पाणी मिळेल, असा दावा रणजितसिंहांनी केला. त्यांनी कितीही दबाव आणला तरी अहवाल सरकारकडे जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. कालव्याला 800 कोटी निधीची गरज आहे. या माध्यमातून 43 हजार हेक्टर लाभक्षेत्र वाढणार असल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय.