युती सोडणार नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार : आठवले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

रायगड : गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. दलितांचे आरक्षण, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असे प्रश्न सोडविले आहेत. यामुळे एखादया जागेसाठी हट्ट करण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि 50 ते 60 कार्यकर्त्यांना महामंडळावर घेणार आहेत. […]

युती सोडणार नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार : आठवले
Follow us on

रायगड : गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. दलितांचे आरक्षण, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असे प्रश्न सोडविले आहेत. यामुळे एखादया जागेसाठी हट्ट करण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाला राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद आणि 50 ते 60 कार्यकर्त्यांना महामंडळावर घेणार आहेत. त्यामुळे एखाद्या जागेसाठी युती सोडणे योग्य नाही, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये बोलताना आठवलेंनी युती सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिवाय विधानसभा निवडणुकीबाबतचीही बोलणी झाली असल्याचं ते म्हणाले. विधानसभेची बोलणी झाली आहे. विधानसभेला काही जागा मिळतील, विधानपरिषदेचीही जागा मिळेल, काही चेअरमनपदं मिळतील, त्यामुळे पक्षाने विचार केला आहे की आपण नरेंद्र मोदी यांना दगा देणे योग्य नसून व्यापक विचार करून निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट झाली. त्यावरही आठवलेंनी उत्तर दिलं. शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली असली तरी त्याचा काही फरक पडणार नाही. आम्ही सगळे मित्रपक्ष  एकत्र असल्याने केंद्र आणि राज्यात नरेंद्र मोदींचे सरकार येणार हे निश्चित आहे, असं ते म्हणाले.

भाजपकडून सध्या चौकीदार ही मोहिम जोरात सुरु आहे. यावरही आठवलेंनी उत्तर दिलं. घराचे, सरकारचे, राहुल गांधी यांचे संरक्षण करण्यासाठी चौकीदार आवश्यक असल्याचं म्हणत भाजपाला 285 जागा मिळतील आणि एनडीएला 325 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.