Rajya Sabha Election: आघाडीच्या बैठकीत 50 मिनिटात नेमकं काय घडलं?; वाचा बैठकीचा आँखो देखा हाल

| Updated on: Jun 07, 2022 | 9:40 PM

Rajya Sabha Election: या बैठकीला सर्वात आधी शरद पवार आले होते. पवार आल्यानंतर ते स्टेजवर बसले. त्यांच्या बाजूला जयंत पाटील बसले होते. तर एक खुर्ची सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. तब्बल दहा ते 15 मिनिटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, केएच पाटील यांचं आगमन झालं.

Rajya Sabha Election: आघाडीच्या बैठकीत 50 मिनिटात नेमकं काय घडलं?; वाचा बैठकीचा आँखो देखा हाल
Rajya Sabha Election: आघाडीच्या बैठकीत 50 मिनिटात नेमकं काय घडलं?; वाचा बैठकीचा आँखो देखा हाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) बैठक आज हॉटेल ट्रायडंटमध्ये पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि एच. के. पाटील आदी नेते उपस्थित होते. तब्बल 50 मिनिट ही बैठक चालली. या बैठकीत आधी मल्लिकार्जुन खरगे बोलले. नंतर शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. मतदान करताना काळजी घ्या. आपलं ऐक्य दाखवा. आपल्याला चारही उमेदवार विजयी करून राज्यसभेत पाठवायचे आहेत. आपल्याला विजयाची पार्टीही करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना सांगितलं. तसेच किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. तसेच बैठकीत सर्वच नेत्यांनी आपल्याकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला.

या बैठकीला सर्वात आधी शरद पवार आले होते. पवार आल्यानंतर ते स्टेजवर बसले. त्यांच्या बाजूला जयंत पाटील बसले होते. तर एक खुर्ची सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. तब्बल दहा ते 15 मिनिटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, केएच पाटील यांचं आगमन झालं. मुख्यमंत्री, पाटील आणि खरगे यांनी पवारांना नमस्कार केला. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सर्वांचं स्वागत केलं. सर्व नेत्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि खरगे यांनी मार्गदर्शन केलं.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री काय म्हणाले?

आपल्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे आपण जिंकून येऊ. सत्तापिपासू लोकांना आपल्याला दूर करायचं आहे. जिंकल्यावर आपल्याला पार्टी करायची आहे. विजयोत्सव करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला.

भाजपला टोला

एक परंपरा आपण पाळत आलो आहोत. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला हरकत नाही. 22-23 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती हे आठवावं लागतं. त्यामुळे सभ्यता पाळायाला हरकत नव्हती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. असं संबोधन सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलवलं असतं. कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीचे चारी उमेदवार राज्यसभेत निवडून जाणारच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चारही उमेदवार निवडून आणा

यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्वांना एकीचं आवाहन केलं. आपल्या चारही उमेदवारांना निवडून आणा. मतदान बाद होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना पवारांनी दिल्याचं सांगितलं जातं.