Raj Thackeray: राज ठाकरे बॅकफूटवर का गेले?; 5 कारणं ज्यामुळे राज यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला

| Updated on: May 20, 2022 | 5:11 PM

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या दौऱ्याला सर्वात आधीविरोध भाजकडूनच झाला. भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला.

Raj Thackeray: राज ठाकरे बॅकफूटवर का गेले?; 5 कारणं ज्यामुळे राज यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला
राज ठाकरे बॅकफूटवर का गेले?; 5 कारणं ज्यामुळे राज यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला आहे. राज ठाकरे पहिल्यांदाच अयोध्येला जाणार होते. त्यासाठी मनसेने (MNS) जय्यत तयारीही केली होती. ट्रेन बुक करण्यात आल्या होत्या. तर काही कार्यकर्त्यांनी बायरोड जाण्यासाठी वाहनेही बुक केली होती. तसेच अयोध्येत राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही करून ठेवण्यात आली होती. हा दौरा कसा असेल याची रुपरेषाही तयार करण्यात आली होती. मात्र राज ठाकरे यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे. भाजपच्याच खासदारांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. तसेच राज यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात वातावरण निर्मिती करण्यात भाजपचे खासदार यशस्वीही झाले होते. त्यामुळे राज यांना बॅकफूटवर जावं लागल्याचं सांगण्यात येतं. राज यांना अयोध्या दौऱ्यावरून बॅकफूटवर का जावं लागलं याचा घेतलेला हा आढावा.

 

हे सुद्धा वाचा

बृजभूषण सिंह यांचा विरोध

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या दौऱ्याला सर्वात आधीविरोध भाजकडूनच झाला. भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला. सिंह यांनी अयोध्यते सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. तसेच साधूसंतांनाही एका छताखाली आणून राज विरोध अधिक प्रबळ केला. त्यामुळे अयोध्येत राज ठाकरेंविरोधातील वातावरण अधिकच तापलं.

आणखी एक खासदार मैदानात, विरोध वाढला

बृजभूषण सिंह यांचा विरोध असतानाच भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनीही सिंह यांच्या सूरात सूर मिसळून राज ठाकरे यांना विरोध केला. राज ठाकरे यांनी माफी मागावी, तर अयोध्येत यावं, असं मनोज तिवारी म्हणाले. विशेष म्हणजे मनोज तिवारी यांनी मुंबईत येऊन हे विधान केलं.

योगी आदित्यनाथ यांचं मौन

खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध केला. त्यासाठी सभा घेतल्या. साधूसंतांच्या भेटीगाठी घेतल्या. मोर्चे काढले. त्यामुळे अयोध्येतील वातावरण ढवळून निघालं. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून सिंह यांनी आंदोलन पेटतं ठेवलं. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. तसेच यावर अनेक तर्कवितर्कही लढवले गेले. भाजपचच सिंह यांना बळ असल्याचं बोललं गेलं.

राज्यातील भाजप नेते कमी पडले

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी भोंग्याविरोधातील आंदोलन हाती घेतलं. त्याचं भाजपनं स्वागत केलं. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचंही स्वागत केलं. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर भाजपची कोंडी झाली. राज्यातील भाजप नेत्यांनी या मुद्द्यावर केवळ राज्यात प्रतिक्रिया दिल्या. पण बृजभूषण सिंह यांना समजावण्यासाठी राज्यातील एकही भाजप नेता अयोध्येला गेला नाही. त्यामुळेही राज ठाकरे यांना आपला दौरा तूर्तास स्थगित करावा लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मनसेची उदासिनता

राज ठाकरे यांनी दौरा जाहीर केल्यानंतर मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल असं वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसलं नाही. केवळ मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अयोध्येला जाण्याची तयारी केली. राज्यातील इतर भागातून राज यांच्या या दौऱ्याला थंड प्रतिसाद मिळाला. हेही त्यांचा दौरा रद्द होण्यामागचं एक कारण असावं, असं सूत्रांनी सांगितलं.