दोन ‘भाऊ’ भेटणार तर शिवसेना-भाजपही जवळ येणार का?; महाराष्ट्राचं राजकारण नवं वळण घेणार?

| Updated on: Jun 08, 2021 | 11:45 AM

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. मराठा आरक्षणासह राज्यातील प्रमुख मागण्या घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दरबारात दाखल झाले आहेत. (will shiv sena and bjp come together in maharashtra?)

दोन भाऊ भेटणार तर शिवसेना-भाजपही जवळ येणार का?; महाराष्ट्राचं राजकारण नवं वळण घेणार?
pm narendra modi- cm uddhav thackeray
Follow us on

नवी दिल्ली: मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. मराठा आरक्षणासह राज्यातील प्रमुख मागण्या घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दरबारात दाखल झाले आहेत. यावेळी ते पंतप्रधानांशी खासगीतही चर्चा करणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज दोन भाऊ दिल्लीत भेटणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप जवळ येणार का? आणि त्या निमित्ताने राज्याचं राजकारण वळण घेणार का? अशी चर्चाही सुरू झाली आहे. (will shiv sena and bjp come together in maharashtra?)

पहिली भेट पुण्यात

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 6 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली भेट घेतली होती. पुण्यात 6 आणि 7 डिसेंबर रोजी देशपातळीवरील पोलीस महासंचालकांची परिषद होती. या परिषदेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान पुण्यात आले होते. त्यावेळी प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री पुणे विमानतळावर गेले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. मात्र या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या फिफ्टी फिफ्टिच्या फॉर्म्युल्यावरून बिनसलं होतं. त्यानंतर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्वं आलं होतं.

दुसरी भेट दिल्लीत

त्यानंतर 21 फेब्रुवारी 2020 रोजी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. यावेळी सीएए, एनपीआर आणि जीएसटीच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘मी अनेक वेळा दिल्लीत आलो होतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटायला आलो. भेटीत खूप चांगली चर्चा झाली. महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. केंद्राचं सहकार्य राज्याला मिळावं असं मी त्यांना सांगितलं. त्यांनीही सहकार्य करू असं सांगितलं. सीएए, एनआरपीबाबत देखील चर्चा केली. या सगळ्याबद्दल मी आगोदरच माझी भूमिका सांगितली आहे. विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली. सीएएबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

राजकीयदृष्ट्या जवळ येणार नाही

मोदी-ठाकरे भेटीच्या निमित्ताने शिवसेना-भाजप राजकीयदृष्ट्या जवळ येतील असं वाटत नाही. पण मधल्या काळात त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली होती. ती दूर व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात आपली सत्ता नसल्याने मोदींकडून महाराष्ट्राची उपेक्षा सुरू आहे. ती अन्यायकारक आहे. ती उपेक्षा थोड्याबहूत प्रमाणात थांबेल, असं राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार यांनी सांगितलं. मोदींच नेतृत्व अहंकारी आहे. महाराष्ट्रातील नेते भेटल्याने त्यांचा अंहकार सुखावेल. अर्थात त्याचा महाराष्ट्रासाठी फायदाच होईल. महाराष्ट्राला सहकार्य मिळू शकेल, असंही चुंचुवार यांनी स्पष्ट केलं.

जवळ येण्याचं औचित्य नाही

मोदी-ठाकरेंच्या या भेटीत सगळं होईल असं वाटत नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये जी बॉन्डिंग आहे ती राहणारच आहे. आरएसएससोबतही उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले आहेत. परंतु, आजच्या भेटीने राजकीय निर्णय होईल असं वाटत नाही. ती वेळही नाही. उद्धव ठाकरे मोदींना खासगीत भेटले तरी त्यातून राज्यात सत्ताबदल होईल किंवा दोन पक्ष एकत्र येतील असं वाटत नाही. तसं काही औचित्यही दिसत नाही, असं राजकीय पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं. (will shiv sena and bjp come together in maharashtra?)

 

संबंधित बातम्या:

Udhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात

ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल; संजय राऊतांना विश्वास

उद्धव ठाकरे मोदींना भेटणार तर मराठा आरक्षणाचा मार्ग खरंच मोकळा होणार?; वाचा सविस्तर

(will shiv sena and bjp come together in maharashtra?)