शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि करारी पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले वरिष्ठ आयपीएस ऑफिसर म्हणजे विश्वास नांगरे पाटील. नांगरे पाटील सध्या मुंबईचे सह पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहतात. 26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले असताना जीवाची पर्वा न करता आत शिरलेल्या जिगरबाज पोलीसांमध्ये नांगरे पाटीलही होते. कडक शिस्तीच्या विश्वास नांगरे पाटील यांच्या मिशा नेहमी ‘वर’ असल्याचं म्हटलं जातं, मात्र कुटुंबीयांमध्ये रमताना ते कसे असतात, त्यांच्या मुलांचं-पत्नीचं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे, विश्वास नांगरे पाटील यांचं लग्न कसं जुळलं, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. (IPS Officer Vishwas Nangre Patil Love Story)
विश्वास नांगरे पाटील यांचा विवाह 2000 मध्ये झाला. अरेंज मॅरेज की लव्ह असा प्रश्न एका कार्यक्रमात त्यांना विचारल्यावर पत्नी रुपाली नांगरे पाटील यांनी पटकन ‘अरेंज’ असं उत्तर दिलं. त्यावर साखरपुड्यापर्यंत अरेंज होतं, नंतर सहा महिने मिळाल्याने लव्ह झालं, अशी खट्याळ प्रतिक्रिया विश्वास नांगरे पाटलांनी दिली होती.
विश्वास नांगरे पाटील 1999 मध्ये आयपीएस झाले. त्यांना औरंगाबादमध्ये प्रोबेशनवर पाठवण्यात आलं. कर्तव्य बजावताना त्यांची ओळख कल्याण औताडे यांच्याशी झाली. त्यांनी नांगरे पाटलांसाठी लग्नाचा प्रस्ताव आणला. उद्योजक पद्माकर मुळे यांची कन्या रुपाली मुळे.
ठरल्याप्रमाणे विश्वास नांगरे पाटील मुलगी पाहायला गेले. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना त्यांनी किस्सा सांगितला होता. विश्वास नांगरे-पाटील त्यावेळी रुपाली यांच्याशी काहीच बोलले नाहीत. विश्वास नांगरे-पाटलांनी मुलगी पाहिली. मात्र सोबत मित्रही असल्यामुळे रुपाली यांना नवरा मुलगा नेमका कोण, हेच कळलं नव्हतं. त्यामुळे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पुन्हा ठेवण्याची वेळ आली. यावेळी फक्त मुलगा-मुलगी अशा दोघांनाच भेटू देण्याचं ठरलं. ते एका कॅफेमध्ये भेटले. दोघांमध्ये चांगल्या तासभर गप्पा रंगल्या.
विश्वास नांगरे पाटील तेव्हा युनिफॉर्ममध्ये आले होते. रुपाली त्यांच्या गणवेशाच्या आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. विश्वास नांगरे-पाटील आणि रुपाली यांच्या साखरपुड्यापासून लग्नात 6 महिन्यांचा कालावधी होता. त्यातच विश्वास नांगरे पाटील यांचा प्रोबेशन पिरीएडही संपत आला होता. नांगरे पाटलांना काश्मीर, भोपाळसारख्या विविध ठिकाणी जावं लागलं. ते रुपालींना एसटीडी बूथवरुन फोन करायचे. दोघांमध्ये तासनतास गप्पा रंगायच्या, त्यावेळी दोन बंदुकधारी पोलीस एसटीडी बूथबाहेर थांबले असायचे.
सुपारी फुटल्यानंतर शेवटचे तीन दिवस होते. प्रोबेशन संपल्यानंतर गडचिरोली, काश्मीर असं आर्मी अटॅचमेंटवर जायचं होतं.”औरंगाबादेत तिच्या गाडीने आम्ही एका माळाच्या कोपऱ्यावर गेलो. पुढे सहा महिने भेटीगाठी अवघड होत्या. त्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो होतो, इतक्यात एक हवालदार तिथे काठी ठोकत आला. त्याने आम्हाला काय करताय विचारलं. ओळख सांगावी तरी पंचाईत होती. मी म्हणालो, आमचा साखरपुडा झालाय, तर म्हणे कशावरुन साखरपुडा झाला, असले चाळे करायला येता का? अखेर कशीबशी सुटका झाली. त्यामुळे मरिन ड्राईव्हला मी कधी त्रास दिला नाही” असा किस्सा नांगरे पाटलांनी एका कार्यक्रमात सांगितला.
अमिताभ बच्चन सारखी पर्सनॅलिटी असल्याचं मला सांगितलं जायचं. लहानपणी एनसीसीमध्ये असल्याने नंतर युनिफॉर्मची आवड निर्माण झाली. आयएएस व्हायची इच्छा होती, मात्र दोन वेळा आयपीएस रँकिंग मिळाली. माझ्या नशिबात तेच असावं. आता 23 वर्ष पोलीस सेवेत असताना कोणतीही खंत नाही, असंही नांगरे पाटलांनी सांगितलं.
‘घरात ते कायम मोबाईलवर असतात, काही विचारलं की.. उं? हं? असं करतात’ असं रुपाली नांगरे पाटील सांगतात. ‘जनरेशनला नावं ठेवताना कायम मोबाईलमध्येच असतात. त्यांना आमच्या जनरेशनशीच प्रॉब्लेम आहे, काही झालं की आम्हाला लहानपणी काहीच मिळालं नाही, मोबाईलमुळे सगळं सोपं झालंय, लायब्ररीमध्ये जा असं सांगतात’ असं त्यांची कन्या जान्हवी म्हणते.
जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’
(IPS Officer Vishwas Nangre Patil Love Story)