Chanakya Neeti : या तीन सवयी व्यक्तीला रंकाचा बनवतात राव, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलं आहे. त्यांनी अशा काही सवयी सांगितल्या आहेत, त्या जर व्यक्तीमध्ये असतील तर त्याची प्रगती होते, असं चाणक्य म्हणतात, त्या सवयींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Neeti : या तीन सवयी व्यक्तीला रंकाचा बनवतात राव, चाणक्य काय म्हणतात?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2025 | 5:45 PM

आर्य चाणक्य यांना केवळ राजकीय विषयाचंच ज्ञान नव्हतं, तर मानवी जीवनाच्या उपयोगामध्ये जे -जे विषय येतात, मानवी जीवनाशी निगडीत जे विषय आहेत, त्या सर्व विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी जे विचार मांडले आहेत, ते विचार आजही मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये व्यक्तीचे अनेक स्वभाव सांगीतले आहेत, या स्वभावानुसार त्यांनी व्यक्तीचं वर्गीकरण देखील केलं आहे. एक चांगला व्यक्ती कसा असतो, त्याचा स्वभाव कसा असतो, त्या व्यक्तीमध्ये अशा कोणत्या सवयी असतात, ज्या त्याला इतर व्यक्तींपेक्षा वेगळ्या बनवतात, आणि त्या सवयींमुळे त्याची कशी प्रगती होते, हे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सविस्तर सांगीतलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

अन्नाचा आदर – चाणक्य नीतीनुसार ज्या घरात सदैव अन्नाचा आदर केला जातो, त्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासत नाही. लक्ष्मी मातेची कृपा अशा घरावर सदैव राहते, त्या घरात कधीही धनाची कमतरता जाणवत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विद्वानांचा आदर – चाणक्य म्हणतात मनुष्याने नेहमी विद्वानांचा आदर केला पाहिजे, विद्वान लोकांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, मूर्खांची संगत कधीही करता कामा नये, मूर्खांच्या संगतीमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, याउलट तुम्ही जर विद्वानांची संगत केली, तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो, आयुष्य कसं जगायचं? याचा मार्ग सापडतो, तुमची प्रगती होते.

पत्नी -पत्नीमध्ये समजुतीची भावना – आर्य चाणक्य म्हणतात पती -पत्नी हे एकाच रथाचे दोन चाक असतात, जोपर्यंत ही दोन्ही चाक सुस्थितीमध्ये असतात, तोपर्यंत तो रथ वेगानं धावतो, मात्र त्यातील एक चाक जर खराब झालं तर रथाच्या गतीला ब्रेक लागतो, तसेच संसाराचं देखील आहे. जर पती-पत्नी दोघेही समजूतदार असतील, त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तर कोणतंही संकट आलं तरी तुम्ही त्यावर सहज मात करतात, संसार सुखाचा होतो. अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो, आणि आयुष्यात नेहमी सुख समाधान राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)