Australia vs India, 1st Test | टीम इंडिया 36 धावात गारद कशी होऊ शकते? लाजिरवाण्या पराभवाची 5 कारणे

| Updated on: Dec 19, 2020 | 2:36 PM

ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Australia vs India, 1st Test | टीम इंडिया 36 धावात गारद कशी होऊ शकते? लाजिरवाण्या पराभवाची 5 कारणे
Follow us on

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा  (India Vs Australia 2020 ) लाजिरवाणा पराभव झाला. हा पराभव इतका लाजिरवाणा होता की, दुसऱ्या डावात भारताचा आख्खा संघ केवळ 36 धावांत गारद झाला. जागतिक कसोटी क्रमवारीत आघाडीवर असलेले भारतीय फलंदाज इतक्या कमी धावांवर कसे ढेपाळू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फक्त दोन गोलंदाजांनी असा काही भेदक मारा केला की, टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. australia vs india 1st test team india 5 reasons for embarrassing defeat

भारताकडून सर्वाधिक धावसंख्या केली ती म्हणजे मयांक अग्रवालने. सर्वाधिक धावसंख्या या शब्दावरुन भल्या मोठ्या धावा केल्या असं वाटू शकतं. पण ही धावसंख्या होती केवळ 9. याच्या पुढे कुणालाही मजल मारता आली नाही. टीम इंडियाचे बिनीचे शिलेदार खेळपट्टीवर उभेही राहू शकले नाहीत. तिघांना तर भोपळाही फोडता आला नाही. चार फलंदाज प्रत्येकी चार धावा करुन माघारी परतले. हनुमा विहारीने 8 आणि उमेश यादवच्या ‘मोलाच्या’ 4 धावांमुळे टीम इंडियाला कशाबशा 36 धावांपर्यंत मजल मारता आली. तळाचा फलंदाज मोहम्मद शमीने 1 धावा केली आणि तो रिटायर्ड हर्ट झाल्याने टीम इंडियाला चाळीशीही गाठता आली नाही.

भारताच्या पराभवाची कारणे

1) आश्चर्यकारक संघ निवड

टीम इंडिया पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरली तेव्हा क्रिकेटप्रेमींना अक्षरश: धक्का बसला. कारण फॉर्ममध्ये असलेल्या के एल राहुलला या संघात स्थान मिळालं नव्हतं. के एल राहुलला संघात स्थान मिळालं नव्हतंच, पण त्याच्या ऐवजी पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे सलामीला उतरणार होते. त्यामुळे क्रिकेटतज्ज्ञ आणि क्रिकेटप्रेमींना हे धक्क्यावर धक्के होते.

2) फलंदाजांनी नांगी टाकली

टीम इंडियाची कामगिरी इतकी ढिसाळ होती की आकडेही न बोलणारे आहेत. भारताकडून दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ 4, मयांक अग्रवाल 9, जसप्रीत बुमराह 2, चेतेश्वर पुजारा 0, विराट कोहली 4, अजिंक्य रहाणे 0, हनुमा विहारी 8, रिद्धिमान साहा 4, रवीचंद्र अश्विन 0, उमेश यादव 4* आणि मोहम्मद शमीने 1 धाव केली. या दुसऱ्या डावात टीम इंडियाचे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर उर्वरित एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

3) ढिसाळ क्षेत्ररक्षण, लाबुनशेनला जीवदान

टीम इंडियाने पहिल्या डावात ढिसाळ फिल्डिंग केली. पहिल्या डावात टीम इंडियाने मार्नस लाबुशेनला तब्बल 3 वेळा जीवनदान दिलं. रिद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह आणि पृथ्वी शॉने हे जीवनदान दिले. लाबुशेनला पहिल्यांदा 4 तर दुसऱ्यांदा 15 धावांवर जीवनदान मिळाल. लाबुशेनने पहिल्या डावात 47 धावा केल्या. रिद्धीमानने लाबुशेनचा कॅच घेतला असता, तर तो  4 धावांवर माघारी परतला असता. याचाच अर्थ असा की टीम इंडियाला अतिरिक्त 43 धावांची आघाडी मिळाली असती. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. टीम इंडियाने लाबुशेनची कॅच घेतली असती, तर कदाचित सामन्याची परिस्थिती वेगळी असती.

4) कोहली रनआऊट

पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि रहाणेने चांगली भागीदारी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. मात्र रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे विराट 74 धावांवर रन आऊट झाला. विराट मैदानात चांगलाच सेट झाला होता. त्याच्या बॉडी लॅंग्वेजवरुन आत्मविश्वास जाणवत होता. मात्र रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे विराटला आपल्या विकेटच बलिदान द्याव लागलं.

5)कमिन्स-हेजलवूडसाठी रणनीती नाही

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या जोडीने टीम इंडियाला दुसऱ्या डावात झटके दिले. कमिन्सने 4 तर हेझलवूडने 5 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाचा डाव अवघ्या 36 धावांवर गडगडला. ज्या पद्धतीने टीम इंडियाच्या फलंदाजांनी सामना केला, त्यावरुन फलंदाजांनी या दोघांविरुद्ध कोणतीच रणनीती न केल्याचं दिसून आलं. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात या दोघांविरोधात चांगली तयारी करावी लागेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात दुसरा सामना  26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test, Day 3 : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा, मालिकेत 1-0 ने आघाडीवर

australia vs india 1st test team india 5 reasons for embarrassing defeat