Best Bus Strike : 382 नंबरची भरलेली बेस्ट बस रिकामी केल्यानंतर प्रसाद लाड खवळले, स्थिती सामान्य होण्याबाबत दिली महत्वाची अपडेट
Best Bus Strike : बेस्ट बसच्या संपाबाबत भाजप नेते प्रसाद लाड यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. पुढच्या किती वेळात परिस्थिती सामान्य होईल त्या बद्दल त्यांनी सांगितलं आहे. या संपावरुन बेस्टच्या युनियनमध्येच मतभेद आहेत. त्यामुळे आपसात राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. टॅक्सी, रिक्षासाठी रांग लागली आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतून कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे. या संघटनेत तब्बल 12 यूनियन आहेत. या संपावर भाजप नेते प्रसाद लाड बोलले आहेत. त्यांची सुद्धा बेस्टमध्ये यूनियन आहे. “बेस्टचा हा संप अनधिकृत आहे. 90 टक्के बीएसटी ओरिजनल कर्मचारी आमच्यासोबत आहेत. कंत्राटी बसेसवरील कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. मुंबईकरांना धारेवर धरण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. उबाठा, कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या युनियनच्या माध्यमातून हे केलं जात आहे. मुंबईत परीक्षांचा, अॅडमिनशनचा हा काळ आहे. मुंबईकरांना अशा प्रकारे धारेवर धरणाऱ्या उबाठाला लोकांनी जागा दाखवून दिली आहे ” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
“कोर्टाने मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी बस फोडण्याचं काम झालं आहे. पण जशास तस उत्तर दिलं जाईल. आमचे लोकं सुद्धा डेपो, डेपो मध्ये आहेत. त्यांच्याकडून बसेस बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे. कंत्राटी बसेस टर्मिनेट करुन त्यांना बीईएसटीवर घेतलं पाहिजे. हे ब्लॅकमेलिंग थांबलं पाहिजे अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
किती वेळात परिस्थिती निवळेल?
“शशांक राव यांच्याशी माझं बोलणं झालं. सकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेस्ट बसेसवर दगडफेक केली. जे कर्मचारी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर मेस्मा लावला पाहिजे. आमचे लोक बेस्ट बसेस बाहेर काढत आहे. एक-दोन तासात परिस्थिती निवळेल” असं प्रसाद लाड बोलले. घाटकोपरमध्ये 382 नंबरची देवनारला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस खाली करण्यात आली.
“काहींनी बाहेरुन गुंड आणून दगडफेकीचे प्रकार केले. कामगार घाबरतो, तो बोलतो मी यात का पडू?. पण तरीदेखील आम्ही कामगारांचं मनोधैर्य वाढवत आहोत. डेपो इन्चार्जशी बोलून बस बाहेर काढण्याचं काम करतोय” असं प्रसाद लाड म्हणाले. दररोज जवळपास 25 लाख लोक बेस्ट बसने प्रवास करतात.