‘तारक मेहता..’च्या सेटवर ढसाढसा रडला ‘बाघा’; अवस्था पाहून थांबवलं शूटिंग
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया एका सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर भावूक झाला आणि त्याला रडू कोसळलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता तन्मय वेकारिया नुकताच शूटिंगदरम्यान सेटवर भावूक झाला. आईच्या आठवणीत तन्मयला इतकं रडू कोसळलं की अखेर निर्माते असित मोदी यांचा मध्येच शूटिंग थांबवावी लागली. यावेळी असित मोदींनी तन्मयला समजावलं, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. ‘तारक मेहता..’च्या सेटवरील हा व्हिडीओ समोर आला असून, तो पाहून चाहतेसुद्धा भावूक होत आहेत. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की तन्मय सीनदरम्यान भावूक होतो आणि ढसाढसा रडू लागतो. हे पाहून मालिकेचे निर्माते असित मोदी पुढे येतात आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात.
‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, तन्मय एका सीनचं शूटिंग करत होता, जो बाघा आणि बावरीच्या लव्ह स्टोरीशी संबंधित होता. मात्र कॅमेरा रोल होताच तन्मय भावूक होतो. तन्मयच्या आईला त्याने साकारलेली बाघाची भूमिका खूप आवडायची. पण काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं. सध्या मालिकेत बाघा आणि बावरीची प्रेमकथा दाखवली जात आहे, जी प्रेक्षकांना खूपच आवडतेय. मात्र आता बाघाच्या भूमिकेत त्याला पाहण्यासाठी आता त्याची आई नाही, हे दु:ख तन्मयला सहन होत नाही आणि तो रडू लागतो.
बाघाचा व्हिडीओ-
View this post on Instagram
तन्मयची ही अवस्था पाहून सेटवरील इतर कलाकारांच्या आणि क्रू मेंबर्सच्या डोळ्यांतही पाणी येतं. यावेळी शूटिंग थांबवलं जातं आणि असित मोदीसोबत इतर काही टीममधील सदस्य तन्मयचं सांत्वन करण्यासाठी त्याच्याकडे जातात. तन्मय त्याच्या आईबद्दल सांगतो की, ‘बाघा’च्या प्रत्येक भागाची त्याचा आई खूप आतुरतेने वाट पाहत असायची. जेव्हा प्रेक्षक त्याच्या अभिनयाचं कौतुक करायचे, तेव्हा त्याची आई खूप आनंदी व्हायची.
2025 मध्ये तन्मय वेकारियाच्या आईचं निधन झालं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने इन्स्टाग्रामवर आईचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी आता माझ्या आईला प्रत्यक्ष भेटू किंवा मिठी मारू शकणार नाही. मला तिची नेहमीच आठवण येईल’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या होत्या. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
