धोनीला 7 व्या क्रमांकावर का पाठवलं? कोहली आणि शास्त्रींना जाब विचारला जाणार?

| Updated on: Jul 12, 2019 | 4:33 PM

या बैठकीत सेमीफायनलमधील कामगिरी आणि काही मुद्द्यांवर प्रश्नही विचारले जाण्याची शक्यता आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समिती निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्याशीही चर्चा करणार आहे.

धोनीला 7 व्या क्रमांकावर का पाठवलं? कोहली आणि शास्त्रींना जाब विचारला जाणार?
Follow us on

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओए भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत समीक्षा बैठक करणार आहे. या बैठकीत सेमीफायनलमधील कामगिरी आणि काही मुद्द्यांवर प्रश्नही विचारले जाण्याची शक्यता आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समिती निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्याशीही चर्चा करणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा रोडमॅप या बैठकीत तयार होईल, असं बोललं जातंय. सीओएमध्ये डायना एडुल्जी आणि निवृत्त लेफ्टनंट जर्नल रिव थोडगे यांचाही समावेश आहे.

सध्या बैठकीची नेमकी तारीख सांगता येणार नसली तरी प्रशिक्षक आणि कर्णधारासोबत बैठक नक्कीच होईल, असं विनोद राय यांनी सांगितलंय. शिवाय निवड समितीसोबतही बातचीत केली जाईल, असं ते म्हणाले.

अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार?

या बैठकीत रवी शास्त्री, विराट कोहली आणि एमएसके प्रसाद यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. अखेरच्या मालिकेपर्यंत अंबाती रायडूची निवड निश्चित मानली जात होती, पण तो चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीतून अचानक बाहेर झाला. दुसरं म्हणजे भारतीय संघात तीन विकेटकीपर होते आणि त्यात दिनेश कार्तिकची काय गरज होती, असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण, दिनेश कार्तिक अनेक दिवसांपासून फॉर्मात नाही किंवा त्याने एखादी मोठी खेळीही केलेली नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेमीफायनलमध्ये धोनीला थेट सातव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. या निर्णयावरुन अनेक माजी खेळाडूंनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा नियम पूर्णपणे चुकीचा होता, असं मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केलंय, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे. अत्यंत निर्णायक सामन्यात हार्दिक पंड्याला धोनीच्या अगोदर पाठवण्यात आलं होतं. शिवाय दिनेश कार्तिकलाही धोनीच्या अगोदर संधी मिळाली. धोनीने सातव्या क्रमांकावर येऊन शेवटपर्यंत लढत दिली, पण अर्धशतक करुनही तो धावबाद झाल्याने भारताला विजयाला मुकावं लागलं.

धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा असल्याचं बोललं जातं. जर सहाय्यक प्रशिक्षकाचा हा निर्णय असेल, तर त्याला मुख्य प्रशिक्षकाने याला विरोध का नाही केला हा प्रश्नही रवी शास्त्री यांना विचारला जाऊ शकतो. विद्यमान निवड समिती बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीपर्यंत कायम ठेवली जाणार आहे. त्यामुळे एमएसके प्रसाद यांचं आणखी सक्रिय योगदान असावं, अशी मागणी केली जाऊ शकते. तर दुसरीकडे शरणदीप सिंह आणि देवांग गांधी यांच्या योगदानाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.