CWG 2022 Cricket : टीम इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश, बार्बाडोसचा 100 धावांच्या फरकानं पराभव

| Updated on: Aug 04, 2022 | 6:45 AM

CWG 2022 Cricket : भारताने ग्रुप स्टेजमधील त्यांच्या तीनपैकी दोन सामने सहज जिंकले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. कालची हिरो ठरली रेणुका. कालच्या सामन्यात काय झालं, जाणून घ्या...

CWG 2022 Cricket : टीम इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश, बार्बाडोसचा 100 धावांच्या फरकानं पराभव
टीम इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच (Womens Cricket Team) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघानं आणखी एका दमदार कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे. भारताची युवा वेगवान गोलंदाज रेणुका सिंग (Renuka singh) हीनं ऑस्ट्रेलियाला चकित केलंय. तिनं पुन्हा एकदा 4 विकेट्स घेत आपली हुशारी दाखवली आहे. तिच्या कामगिरीच्या जोरदार चर्चाही रंगली आहे. ज्याच्या जोरावर भारताने बार्बाडोसचा 100 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलंय. भारताच्या 163 धावांच्या प्रत्युत्तरात बार्बाडोसचा संघ कधीही चांगल्या स्थितीत दिसला नाही आणि संपूर्ण संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 62 धावा करू शकला. बार्बाडोसच्या या अवस्थेला उगवती वेगवान गोलंदाज रेणुका सिंग जबाबदार होती. ज्याने २९ जुलै रोजी खेळांच्या पहिल्याच सामन्यात पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाचे अव्वल चार विकेट्स चकित केले होते. रेणुकानं नेमक्या त्याच कामगिरीची येथे पुनरावृत्ती केली आणि पॉवरप्लेमध्ये 4 विकेट घेत पुन्हा एकदा भारताचा विजय निश्चित केला.

बीसीसीआयचं ट्विट

विंडीजचा डाव 5 षटकांतच गडगडला

एक दिवस आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा विंडीजचा दिग्गज फलंदाज आणि बार्बाडोसचा महान फलंदाज डायंड्रा डॉटिनचा कदाचित शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना एक वाईट आठवण म्हणून संपला. रेणुकाने (4 षटके, 10 धावा, 5 विकेट) त्याला डावाच्या तिसऱ्या चेंडूवर खाते न उघडता माघारी परतवले. त्यानंतर तिसऱ्या षटकात रेणुकाने कर्णधार हेली मॅथ्यूजलाही पॅव्हेलियन परतवले. लवकरच बार्बाडोसची धावसंख्या 5 षटकांत 19 धावा आणि 4 विकेट्स अशी झाली. चारही विकेट रेणुकाच्या खात्यात आल्या. यानंतर बार्बाडोसकडे परतण्याचा कोणताही मार्ग उरला नाही आणि भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

खराब सुरुवात, शेफालीचे झटपट उत्तर

भारताची सुरुवातही चांगली झाली नाही आणि पहिल्या दोन सामन्यात शानदार फलंदाजी करणारी स्टार सलामीवीर स्मृती मानधना दुसऱ्याच षटकातच माघारी परतली. येथून तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यात मजबूत भागीदारी झाली. शेफालीने विशेषत: चौकार मारून धावसंख्या 9 षटकांत 76 पर्यंत नेली. ती धडाकेबाज अर्धशतकाकडे जात होती, पण दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात ती धावबाद झाली.

दीप्ती-जेमिमाची मजबूत भागीदारी

येथून पुन्हा भारताला झटपट आणखी दोन धक्के बसले. कर्णधार हरमनप्रीत कौर पहिल्याच चेंडूवर कोसळली, तर या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आलेली तानिया भाटियाही अपयशी ठरली. भारताने 13 षटकांत 92 धावांत 4 विकेट गमावल्या. भारतीय संघ मोठ्या धावसंख्येपासून वंचित असल्याचे दिसत होते, परंतु जेमिमा आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांनी मजबूत भागीदारी केली. दोघांनी शेवटच्या 7 षटकांत 70 धावा जोडून भारताला 162 धावांपर्यंत नेले. जेमिमा 56 धावा (46 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार) आणि दीप्ती शर्मा 34 धावा (28 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) नाबाद परतल्या.