INDvsAUS | इंदूर कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला तगडा झटका, आयसीसीचा मोठा निर्णय

टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यात शानदार विजय मिळवला. मात्र त्यानंतर इंदूरमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला.

INDvsAUS | इंदूर कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला तगडा झटका, आयसीसीचा मोठा निर्णय
| Updated on: Mar 03, 2023 | 9:24 PM

इंदूर | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 9 विकेट्सने पराभव केला. तिसऱ्याच दिवशी हा सामना निकाली निघाला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 76 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेतील पहिला विजय मिळवला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी स्थिती झाली आहे. या पराभवामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला आयसीसीने भारताच्या अडचणी वाढवल्या आहेत. आयसीसीने इंदूरमधील तिसऱ्या कसोटीतील पिचबाबत रिपोर्ट दिला आहे.

आयसीसीने होळकर स्टेडियममधील खेळपट्टीला वाईट असा शेरा दिला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे टीम इंडियाच्या अडचणी दुप्पट झाल्या आहेत. या रेटिंगनंतर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये नुकसान होण्याची भीती आहे.

आयसीसीकडून इंदूरला वाईट शेरा

पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीप्रमाणे तिसरा कसोटी सामना हा तिसऱ्याच दिवशी संपला. यानंतर आयसीसी मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही कर्णधारांसोबत चर्चा केली. यानंतर मॅच रेफरीने रिपोर्ट दिला. यानंतर होळकर स्टेडियममधील खेळपट्टीला 3 डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले. बीसीसीआयकडे आता 14 दिवसांची मुदत आहे. बीसीसीआयला आयसीसीच्या या निर्णयाबाबत आक्षेप असेल, तर तो 14 दिवसांच्या आत नोंदवावा लागेल.

“खेळपट्टी फार कोरडी होती. बॅट आणि बॉलमध्ये बॅलन्स नव्हता. खेळपट्टी सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांसाठी मदतशीर ठरत होती. संपूर्ण सामन्यात फार बाऊन्स आणि त्या विरुद्ध अशी स्थिती होती”, अशी प्रतिक्रिया ब्रॉड यांनी दिली.

याआधी नागपूर आणि दिल्ली कसोटीतही सामना तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. मात्र यो दोन्ही खेळपट्टींना आयसीसीकडून एव्हरेज अर्थात सरासरी असा शेरा देण्यात आला.

दरम्यान टीम इंडियाने इंदूर कसोटी गमावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. आता टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. हा चौथा सामना 9 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.