
टीम इंडियानं आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये विजयाची लय कायम ठेवली आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर सराव सामन्यात देखील भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाच्या प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाचा सहा विकेटनं धुव्वा उडवला. या सामन्यात पावसानं देखील हजेरी लावली होती. मात्र तरी देखील हा सामना भारतानं सहा गडी राखून आपल्या खिशात घातला. मात्र या सामन्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील आश्चर्याचा धक्का बसला. भारतानं हा सामना जिंकल्यानंतर देखील अंपायरनं खेळ सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे रोहित शर्माला देखील आपलं हसू आवरता आलं नाही.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघादरम्यान एक 46 षटकांचा सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतासमोर निर्धारीत 46 षटकांमध्ये 241 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं 43 व्या षटकामध्येच सहा गड्याच्या मोबदल्यात सामना जिंकला, मात्र तरी देखील अंपायरने सामना सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर अशी माहिती समोर आली की हा सराव सामना असल्यामुळे अंपायरेने निर्धारीत 46 षटकापर्यंत हा सामना टीम इंडिया जिंकल्यानंतर देखील सुरूच ठेवला.
रोहितची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाविरोधात खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजी करतो मात्र या सामन्यात रोहितने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या नंबरवर देखील रोहितला फारशी चांगली कामगिरी करण्यात यश आलं नाही. रोहित शर्मा 11 चेंडूमध्ये 3 धावा करून बाद झाला. पर्थ कसोटी सामना रोहित खेळू शकला नाही, बुमहराच्या नेतृत्वात या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
तर दुसरीकडे अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना शुभमन गिल खेळू शकला नव्हता. मात्र त्याने या सामन्यात जोरदार पुनरागमन करत अर्धशतक ठोकलं. त्याने 62 चेंडूमध्ये 50 धावा केल्या.