IND vs ENG : सरफराज खानचं स्वप्न अखेर झालं पूर्ण! बीसीसीआयने ट्वीट केलेल्या व्हिडीओत सर्व काही सांगितलं

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरु होणार आहे. मालिकेत कमबॅक करण्याचं टीम इंडियासमोर मोठं आव्हान असेल. तर केएल राहुल, जडेजा संघात नसल्याने कोणाला संधी मिळणार असाही प्रश्न आहे. असं असताना संघात सरफराज खान याची निवड झाली आहे. दुसऱ्या कसोटी प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की नाही हे माहिती नाही. पण बीसीसीआयने ट्वीट केलेल्या व्हिडीओतून असे संकेत मिळत आहेत.

IND vs ENG : सरफराज खानचं स्वप्न अखेर झालं पूर्ण! बीसीसीआयने ट्वीट केलेल्या व्हिडीओत सर्व काही सांगितलं
IND vs ENG : सरफराज खान इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार! बीसीसीआने ट्वीट केलेल्या व्हिडीओत म्हणाला..
| Updated on: Feb 01, 2024 | 7:35 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी मालिका जिंकणंही गरजेचं आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व अधोरेखित होत आहे. पण दुसऱ्या कसोटीत दिग्गज खेळाडू नसल्याने रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. केएल राहुल, रवींद्र जडेजा दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संघात सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमारला संघात स्थान मिळालं आहे. पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार? याबाबतही साशंकता आहे. सरफराज खान की रजत पाटीदार यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. असं असताना बीसीसीआयने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात सरफराज खान याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत आहे. यातूनच तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असा अंदाज बांधला जात आहे. तसेच संयम किती महत्त्वाचा आहे हे देखील तो या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

“संयमावरच सर्वकाही अवलंबून आहे. जर आम्हाला कसोटी खेळायची आहे तर संयम ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा आपण घाई करतो आणि नेमकं तिथेच चुकतं. मला अश्रू अनावर झाले होते. आता येणार..आता येणार अशी वाट पाहून..मला वडिलांनी एकच सांगितलं की मेहनत करत राहा. तुला कोणीच अडवू शकत नाही. मला वाटतं की विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर संयमही महत्त्वाचा आहे. माझ्यापेक्षा मी माझ्या वडिलांसाठी खूश आहे. अभिमानाची बाब आहे. 1.25 कोटी लोकांमधून आपली संघात निवड होणं अभिमानस्पद आहे.”, असं सरफराज खान याने सांगितलं.

“मी तर रणजी ट्रॉफी खेळायला जाणार होतो. त्यासाठी मी इंडिया ए चे कपडे बाजूला पॅक करून ठेवले होते. अचानक मला कॉल आला की मी सिलेक्ट झालो आहे. पहिल्यांदा मला विश्वासच बसला नाही. विचित्र वाटत होतं. खरंच माझं सिलेक्शन झालं आहे का? मग घरी सांगितलं सर्वकाही. वडील घरी नव्हते ते गावी होते. त्यांना कॉल करून सांगितल्यानंतर ते देखील खूश झाले. सर्वच इमोशनल झाले होते.”, असंही सरफराज खान पुढे म्हणाला.

“मी जी काही मेहनत केली ती वाया गेली नाही. आता मी संघात आलो आहे आणि खूप खूश आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. जेव्हा खेळेन तेव्हा स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.”, असंही सरफराज खानने पुढे सांगितलं.