Thomas Cup 2022: इतिहास रचणाऱ्या बॅडमिंटन टीमला मिळणार 1 कोटी रुपये, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

| Updated on: May 15, 2022 | 4:51 PM

भारताच्या विजयात शेवटचा अध्याय किदाम्बी श्रीकांतने लिहिला. किदाम्बी श्रीकांत बरोबर लक्ष्य सेन आणि सात्विक-चिरागच्या जोडीचा सुद्धा हा विजय आहे.

Thomas Cup 2022: इतिहास रचणाऱ्या बॅडमिंटन टीमला मिळणार 1 कोटी रुपये, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
indian badminton team
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारताने आज बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला. 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाला नमवून पहिल्यांदाचा थॉमस कप (Thomas cup) स्पर्धा जिंकली. लक्ष्य सेने, किदाम्बी श्रींकातसह अन्य खेळाडूंनी भारताला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिलं. या विजयामुळे संपूर्ण देशात उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी स्वत: खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. “भारताच्या बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. संपूर्ण देश थॉम्स कप जिंकल्याने उत्साहित आहे. भारतीय बॅडमिंटन संघाला या विजयाबद्दल शुभेच्छा. या विजयातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल” असं मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी थॉमस चषक विजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत व क्रीडा मंत्रालयाकडून 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा भारतीय बॅडमिंटन संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

एचएस प्रणॉयला फायनलमध्ये उतरण्याची वेळच आली नाही

भारताच्या विजयात शेवटचा अध्याय किदाम्बी श्रीकांतने लिहिला. किदाम्बी श्रीकांत बरोबर लक्ष्य सेन आणि सात्विक-चिरागच्या जोडीचा सुद्धा हा विजय आहे. थॉमस कप ही सांघिक स्पर्धा आहे. एचएस प्रणॉयला फायनलमध्ये उतरण्याची वेळच आली नाही. आज भारताचं स्वप्न साकार झाला. या संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचा, उर अभिमानाने भरुन आलेल्या प्रत्येक भारतीयाचा हा विजय आहे.

अजित पवारांनी केलं अभिनंदन

“या विजयानं भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे. पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसंच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या कामगिरीनं देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.