IND vs ENG: टीम इंडियाने न्यूझीलंडच्या पराभवातून काय धडे घ्यावेत? फलंदाजीत आता ‘या’ चूका नाही परवडणार

| Updated on: Nov 09, 2022 | 7:21 PM

IND vs ENG: आता संधी नसणार, त्यामुळे टीम इंडियाने कुठल्या चूका टाळल्या पाहिजेत ते जाणून घ्या....

IND vs ENG: टीम इंडियाने न्यूझीलंडच्या पराभवातून काय धडे घ्यावेत? फलंदाजीत आता या चूका नाही परवडणार
Team india
Image Credit source: twitter
Follow us on

एडिलेड: टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी इंग्लंड विरुद्ध सामना रंगणार आहे. एडिलेड ओव्हलवर ही मॅच होईल. टी 20 हा क्रिकेटचा छोटा फॉर्मेट आहे. T20 क्रिकेटमध्ये काही ओव्हर्समध्ये समीकरणं बदलतात. कधी कुठली टीम जिंकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे चालू वर्ल्ड कपमध्ये अनेक छोट्या-छोट्या टीम्सनी मोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिले आहेत. तेच या टी 20 वर्ल्ड कपच वैशिष्ट्य राहिलं आहे.

चॅम्पियन टीमसारखा आवेश नाहीय

टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल पर्यंतच प्रवास समाधानकारक आहे. पण त्यात चॅम्पियन टीमसारखा आवेश नाहीय. टीम इंडियाने पाकिस्तान, बांग्लादेश या तुल्यबळ टीम्स विरुद्ध अटी-तटीच्या सामन्यात विजय मिळवलाय. फक्त नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे विरुद्ध मोठे विजय मिळवलेत. ग्रुप 1 शी तुलना करता ग्रुप 2 मध्ये थोड्या सोप्या टीम होत्या. ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका असे बलवान संघ होते. त्यातही दक्षिण आफ्रिकेसारख्या तुल्यबळ टीम विरुद्ध आपण हरलो.

….तरच फायनलमध्ये पाकिस्तानला भिडता येईल

हे लिहिताना आपण मिळवलेल्या विजयाला कमी लेखण्याचा उद्दशे नाहीय. पण टीम इंडियाची अनुभव, ताकद लक्षात घेता, आपण तसा खेळ दाखवलेला नाही. आता नॉकआऊट इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाला आपल्या खेळाचा स्तर उंचावणं आवश्यक आहे, तरच फायनलमध्ये पाकिस्तानला भिडता येईल.

विजयात फक्त दोघांच योगदान

टीम इंडिया सुपर 12 राऊंडमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळली. त्यात चार विजय आणि एक पराभव अशी आकडेवारी आहे. जिंकलेल्या सामन्यावर नजर टाकली, तर फलंदाजीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या कामगिरीत सातत्य दिसलं आहे. केएल राहुलला बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यापासून सूर गवसल्याच दिसतय. त्याने सलग दोन अर्धशतक झळकावली आहेत. पण हीच कामगिरी त्याला उद्या इंग्लंड विरुद्ध कायम ठेवावी लागेल.

….तर काय करणार?

कॅप्टन रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांनी उद्या धावा करणं आवश्यक आहे. हार्दिक पंड्या पाकिस्तान विरुद्धचा सामना सोडल्यास अन्य मॅचेसमध्ये संघर्ष करताना दिसला. दिनेश कार्तिकचा रोल फिनिशरचा आहे. पण मोक्याच्या क्षणी तो ढेपाळला. स्वस्तात बाद झाला. सुनील गावस्करांनी एका शंका बोलून दाखवलीय. एखादा दिवस सुर्यकमार यादवचा नसेल, तर काय करणार?. त्यांच्या पॉइंटमध्ये तथ्य आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव एखाद दिवशी नाही चालले, तर काय करणार?

विराटने सोडलेली ती कॅच

त्यामुळे रोहित, राहुल, हार्दिक आणि दिनेश यांनी जबाबदारीने खेळण जास्त गरजेच आहे. मागच्या काही सामन्यात आपण 180 च्या आसपास धावा केल्या आहेत. वरील फलंदाजांनी हातभार लावला असता, तर टीम इंडियाची धावसंख्या 200 च्या सुद्धा पुढे गेली असती. पावरप्लेमध्ये टीम इंडियाच्या जास्त धावा निघत नाहीयत, ही सुद्धा चिंतेची बाब आहे.

नॉकआऊटमध्ये या चूका टाळाव्या लागतील. आज न्यूझीलंडने पावरप्लेमध्ये पाकिस्तान विरुद्ध फक्त 38 धावा केल्या. त्यांचे दोन विकेट गेले होते. झेल सोडले. खराब फिल्डिंग केली. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांची कॅच सोडली होती. अशा चूका आता परवडणार नाही. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला आपली कामगिरी उंचावावी लागेल.