वेलिंग्टन: न्यूझीलंड विरुद्ध तीन टी 20 सामन्याची सीरीज शुक्रवारपासून वेलिंग्टनमध्ये सुरु होत आहे. या सीरीजसाठी टीम इंडियाची कॅप्टनशिप हार्दिक पंड्याकडे आहे. न्यूझीलंड विरुद्ध मालिका सुरु होण्याआधी हार्दिक पंड्याने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2022 मधील पराभव मागे सोडून आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. सर्वच युवा खेळाडूंना टीममध्ये स्थान बनवण्याची पूर्ण संधी दिली जाईल.
हार्दिक पंड्याने मांडलेले 5 महत्त्वाचे मुद्दे
पुढच्या टी 20 वर्ल्ड कपला अजून दोन वर्ष बाकी आहेत. नवीन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. बरच क्रिकेट खेळलं जाणार. अनेक खेळाडूंना संधी मिळेल. ज्या खेळाडूंना निवडलय, ते गेल्या दोन वर्षांपासून खेळतायत. त्यांना बऱ्याच संधी दिल्या आहेत. त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केलीय.
टी 20 वर्ल्ड कप 2024 चा रोडमॅप आतापासून सुरु होतोय. आपल्याकडे अजून वेळ आहे. सध्या सर्वच खेळाडूंनी न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. भविष्याबद्दल पुढे चर्चा होईलच.
काही खेळाडूंसाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. जे चांगले खेळतील, त्यांची टीममधील दावेदारी आणखी भक्कम होईल.
टीम इंडियाला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीय. खराब खेळल्यानंतर लोक टीका करणार. खेळात प्रत्येक जण सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीय.
आता टी 20 वर्ल्ड कपमधील पराभव मागेसोडून पुढे जाण्याची वेळ आलीय. आम्हाला चूका सुधारुन अजून चांगल्या कामगिरीसाठी मेहनत करावी लागेल.