मुंबई: Mumbai Indians साठी यंदाचा IPL 2022 सीजन खूपच निराशाजनक ठरला. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात खराब प्रदर्शन केलं. मुंबईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये (Points Table) तळाला आहे. मुंबईने सलग आठ सामने गमावले. पाचवेळचा आयपीएल विजेता संघ अशी कामगिरी करेल, याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. इतक्या खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सची टीम मंथन मोडमध्ये आहे. या खराब प्रदर्शनाची काय कारण आहेत? कशामुळे अशी परिस्थिती ओढवली? यावर मुंबई इंडियन्सचं टीम मॅनेजमेंट नक्कीच विचार मंथन करेल. पुढच्या सीजनच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सला काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश करावा लागेल. काही जुन्या खेळाडूंना डच्चू देण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. मुंबई इंडियन्सची पुढच्या सीजनसाठी काय रणनिती असेल? काय बदल केले जातील, यावर दिग्गज क्रिकेटपटू आपले विचार व्यक्त करतायत.
माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा यांच्यामते मुंबई इंडियन्स पुढच्या सीजनसाठी कायरन पोलार्डला रिलीज करेल. कायरन पोलार्डने चांगली कामगिरी केली नाही. त्याने फक्त् 144 धावा केल्या. कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं होतं. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि पोलार्ड या चार खेळाडूंना मुंबईने रिटेन केलं होतं. मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डला या सीजनसाठी 6 कोटी रुपये दिले होते.
कदाचित आपण कायरन पोलार्डचा शेवटचा सीजन बघितलाय, असं आकाश चोप्रा म्हणाले. कायरन पोलार्डला रिलीज केलं, तर मुंबई इंडियन्सचे 6 कोटी रुपये फ्री होतील. त्याशिवाय मुरुगन अश्विन (1.6 कोटी), टायमल मिल्स (1.5 कोटी) आणि जयदेव उनाकडकट (1.3 कोटी) या चार खेळाडूंना रिलीज करु शकते.
कायरन पोलार्डने वयाची 35 वर्ष ओलांडली आहेत. त्याशिवाय ते खराब फॉर्मचा सामना करतोय. या सीजनमध्ये पोलार्डकडून फिनिशिंग रोलची अपेक्षा होती. पण तो ही अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुनही त्याने निवृत्ती स्वीकारलीय. याच सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला शेवटच्या दोन-तीन सामन्यांमध्ये खेळवलं नाही. कायरन पोलार्ड मागच्या सीजनपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी मोठा खेळाडू होता. त्याने अनेक सामने जिंकून दिले होते.
मुंबई इंडियन्सने या सीजनमध्ये 10 सामने गमावले. त्याशिवाय ते प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नाहीत. कायरन पोलार्डसह रोहित शर्मा सुद्धा फ्लॉप ठरला. पुढच्या सीजनमध्ये जोफ्रा आर्चर आला, तर कदाचित मुंबईच्या संघाला मजबुती मिळेल.