आयपीएल 2024 गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सर्वात तळाशी आहे. तसेच प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आशाही धुसर झाल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सातही सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. तर 16 गुणांसह प्लेऑफमधलं स्थान निश्चित होईल. असं सर्व गणित असताना आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संघाच्या सहाव्या पराभवानंतर अँडी फ्लॉवर यांनी आक्रमक रणनिती अवलंबली आहे. त्यांनी आपल्या संघाला यासाठी कानमंत्रही दिला आहे. त्यामुळे येत्या सामन्यात आरसीबीचा संघ कसा खेळतो? याकडे लक्ष लागून आहे.
“उर्वरित सातही सामने उपांत्य फेरीसारखे खेळले जातील. ही नॉकआऊटची वेळ आहे आणि प्रत्येक सामना आमच्यासाठी सेमीफायनल आहे. आम्ही स्पर्धेत कमबॅक करण्याचा कसून प्रयत्न करू.”, असं अँड फ्लॉवर यांनी सांगितलं. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 287 धावांचं लक्ष्य ठेवूनही आरसीबीने हा सामना फक्त 25 धावांनी गमावला. त्यावर भाष्य करताना अँडी फ्लॉवर म्हणाला की, “आम्ही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली. त्याबाबत मला गर्व आहे. आम्ही सामना गमावला पण आम्ही ज्या प्रकार फलंदाजी केली ते अभिमान बाळगण्यासारखं आहे.”
अँडी फ्लॉवरने दिनेश कार्तिकची स्तुती करताना सांगितलं की, “त्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी पिसं काढली ती पाहता त्याला विकेटकीपर फलंदाज म्हणून भारतीय संघात टी20 वर्ल्डकपसाठी निवडलं गेलं तर आश्चर्य वाटायला नको. दिनेश कार्तिकने फलंदाजीने भारताच्या वर्ल्डकप संघात आपली दावेदारी सादर केली आहे. तसेच मैदानात चांगली फलंदाजी करताना दिसत आहे.” टी20 वर्ल्डकपसाठी संघ 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी घोषित केला जाणार आहे.
आरसीबीचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत 21 एप्रिलला आहे. त्यानंतर 25 एप्रिलला पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. त्यानंतर 28 एप्रिल आणि 4 मे रोजी गुजरातशी लढत होणार आहे. 9 मे रोजी पंजाब, 12 मे रोजी दिल्ली आणि 18 मे रोजी चेन्नईशी सामना होणार आहे.