क्रिकेटच्या पलीकडील आयपीएलचा धंदा, टीमचे मालक असे कमावतात करोडोंमध्ये पैसा, जाणून घ्या अर्थकारण
IPL Business Model in Marathi : आयपीएल स्पर्धेचं अर्थकारण थोडक्या शब्दात सांगणं म्हणजे एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारण्यासारखं आहे. त्यामुळे आयपीएलमधील ही सर्व आकड्याची आणि पैशांची गणितं कशी ठरतात? सामन्यात जसा रनरेट महत्त्वाचा तसाच आयपीएलमध्ये पैसा महत्त्वाचा. पण या सर्वात श्रीमंत लीगमधील संघांची कमाई कशी होते? पराभवानंतर पण मालकांना फायदा होतो? सर्वसामान्य वाचकांच्या मनातील प्रश्नांचा अभ्यास करुन आम्ही निरसण करण्याचा प्रयत्न केलाय. जाणून घ्या.
आयपीएल म्हणजे भारतात एक उत्सवच झाला आहे. प्रसिद्ध क्रिकेट लीगमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा समावेश होतो. पाण्यासारखा पैसा म्हणजे करोडो रूपयांची उलाढाल या लीगदरम्यान होते. क्रिकेट वर्ल्ड कप पेक्षाही भारतातील क्रिकेट चाहते आयपीएलची उत्सुकतेने वाट पाहतात. भारतामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि रात्री टीव्हीवर आयपीएलचे सामने हे एक समीकरणच झालं आहे. या प्रसिद्ध लीगमध्ये आयपीएल विजेत्या संघाला 20 कोटी रूपये मिळतात. पण प्रत्येक संघासाठी ही रक्कम शुल्लक आहे. कारण संघातील खेळाडूंना लिलावातच करोडो रूपयांमध्ये विकत घेतलं जातं. मग आयपीएल टीम मालकांना करोडो रूपये खर्च करून काय फायदा? तुम्ही फक्त आयपीएल पाहिलीत मात्र त्यामागचं अर्थकारणही समजून घ्या.
आयपीएल बिझनेस मॉडेल
आयपीलएलबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार हे बीसीसीआयकडे आहेत. बीसीसीआय ही सरकारी संख्या नसून खासगी संस्था आहे. आयसीसीने बीसीसीआयच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या संस्थेकडे हक्क दिले तर बीसीसीआय काही करू शकत नाही. मात्र बीसीसीआयचा दबदबा जगभरातील क्रिकेट मंडळात आहे. BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत किकेट मंडळ म्हणून ओळखलं जातं. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार असताना उपाध्यक्ष ललित मोदी यांनी पुढाकार घेत या लीगला सुरूवात केली होती.
IPL मध्ये टीम कशी खरेदी करावी लागते?
तुम्हाला जर आयपीएलमध्ये टीम घ्यायची असेल तर काय करावं लागतं? कोणत्या अटी असतात? इतका पैसा लावून तो परत मिळवून नफा कसा मिळवतात? विनिंग प्राईज फक्त 20 कोटी असल्याने फ्रँचायसी कसा पैसा कमवतात? समजून घ्या सोप्या शब्दात. तुमच्याकडे पैसे आहेत अन् तुम्ही गेले की मला टीम विकत घ्यायची आहे,तर असं होत नाही. आयपीएलमध्ये नवीन टीम घेण्यासाठी त्यासाठी दोनच पर्याय आहेत. पहिला म्हणजे आता ज्या आयपीएल टीम्स आहेत त्यांच्या मालकांकडे जाऊन त्यांचे शेअर्स विकत घेणे. तर दुसरा पर्याय बीसीसीआय नवीन टीमचा समावेश करण्याची घोषणा करेपर्यंत वाट पाहायची. यासाठी बीसीसीआय ज्यावेळी नवीन टीमचा समावेश करणार असल्याची घोषणा करतं त्यावेळी प्रोसेसनुसार नियोजनबद्ध काम चालतं.
IPL मध्ये नवीन टीम घेण्यासाठीची प्रोसेस
बीसीसीआयने नवीन टीम घेणार असल्याची घोषणा केल्यावर ज्या कंपनीला टीम विकत घ्यायची असेल त्या कंपनीची (Valuation) कमवण्याची क्षमता 3000 करोडोंपेक्षा जास्त असेल. ज्या कंपन्या यासाठी पात्र ठरतात त्यांना ITT (Inviatation To Tender) खरेदी करावं लागतं. याची किंमत 10 लाख असते, ही रक्कम नॉन रिफंडेबल असते. याशिवाय तुम्ही बिडिंगमध्ये भाग घेऊ शकत नाही. यासाठी संबंधित कंपनीला बीसीसीआयला मेल करावा लागतो. इतकं सर्व करूनही म्हणजेच आयटीटी तुम्ही खरेदी केला असेल तरीसुद्धा बीसीसीआय तुम्हाला कोणतीही कल्पना न देता आयटीटी रद्द करू शकतं. ज्या कंपन्यांची यासाठी निवड केली गेलीये त्यांनाच बिडिंग प्रोसेसमध्ये घेतलं जातं. यामध्ये जी टीम असेल तिची प्राईज कमीत कमी 1700 ते 1900 करोड यादरम्यान असते. या किंमतीच्या आतमध्ये टीमची खरेदी होऊ शकत नाही. त्यानंतर बोली लागते आणि सर्वाधिक बोली लावणारी कंपनी टीम खरेदी करते.
टीम खरेदी केल्यावर तुम्हाला खेळाडू विकत घ्यावे लागतात. कोणत्याही खेळाडूला आयपीएल लिलावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तीन प्रकारे तुम्हाला नाव नोंदवता येऊ शकतं. कॅप्ड प्लेअर (देशाचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू), अनकॅप्ड प्लेयर (जे खळाडू एकही सामना देशाकडून खेळले नाहीत) आणि विदेशी खेळाडू असं वर्गीकरण होतं. याधील अनकॅप खेळाडूंची नावे स्टेट असोसिएशन पाठवतं. असे एकूण 1000 ते 1500 खेळाडूंची नाव पाठवली जातात पण यामधील 500 किंवा 600 खेळाडूंची नावं निश्चित केली जातात.
BCCI चे बिडिंगसाठी महत्त्वाचे नियम
एकाच मालकाने आपल्या टीममध्ये अकराच्या अकरा बेस्ट खेळाडू खरेदी केले. तर आयपीएलमध्ये मजा राहणार नाही. यासाठी बीसीसीआयने काही नियम केले आहेत. प्रत्येक फ्रँचायसीला लिमिटेड अमाऊंट म्हणजेच पर्स मनी दिला जातो. पहिली याची मर्यादा 85 करोड होती आता 90 करोड केली गेली आहे. या पर्समनीतून 18 ते 25 खेळाडूंची खरेदी करावी लागते. यामध्ये तुम्ही 8 विदेशी खेळाडूंना खरेदी करू शकता. बिडिंगमध्ये सुरूवातीला मार्की प्लेयर्स घेतले जातात, मार्की प्लेयर्स म्हणजे या खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी असते. यामध्ये बॅट्समन, बॉलर आणि ऑल ऑल राऊंडर वर्गीकरण केल्यानंतर बिडिंग होतं. खेळाडूंवर बोली लावतानाही काही नियम आहेत.
खेळाडूंवर बोली लावताना टीम मालकांसाठी नियम
दरवर्षी मिनि बिडिंग केलं जातं त्यामध्ये फ्रँचायसी नको असलेल्या खेळाडूंना रीलीज करतात. तर तीन वर्षांनी मेगाऑक्शन होतं. काहीवेळा हे पुढे-मागेही होऊ शकतं. ज्यामध्ये प्रत्येक फँचायली आपल्या टीममध्ये फक्त चार खेळाडूंना संघात ठेवू शकतो, बाकी सर्व खेळाडूंना रीलीज केले जातात. ज्या खेळाडूंची बेस प्राईज 20 लाख ते 1 करोडपर्यंत आहे त्यांची बिडिंग 5 लाखाने वाढते. तर 1 ते 2 करोड अशी बेस प्राईज असणाऱ्या खेळाडूंची बोली 10 लाखाने वाढवता येऊ शकते.
टीम तयार झाल्यावर सपोर्ट स्टाफ, अॅडमिन कॉस्ट, सीझन सुरू असताना खेळाडूंना राहण्यासाठीची फाईव्ह स्टार हॉटेल्स आणि विमानाची तिकीटे या सगळ्याचा खर्च टीमच्या मालकांकडे असतो. सीझनमध्ये एका संघाचा सरासरी खर्च हा 200 कोटी होतो. टीम विकत घेताना करोडोंमध्ये पैसे त्यानंतर आयपीएल सुरू झाल्यावर हा खर्चही टीमच्या मालकांना करावा लागतो. जर मालकाला खिशातील पैसे लावावे लागणार असतील तर टीम घेऊन काय फायदा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आयपीएलमधील टीम मालकांना पैसे कसे मिळतात? विजेतेपद जिंकलं तर अवघे 20 कोटी मिळतात मग इतका खर्च कसा भरून निघणार? यातून प्रॉफिट म्हणजेच नफा कसा मिळणार? जाणून घ्या.
आयपीएलच्या टीम मालकांना असा होतो फायदा?
आयपीएलच्या टीम्सला सर्वात जास्त नफा IPL Broadcast Rights मधून मिळतो. ज्या चॅनेलकडे Broadcasting चे हक्क आहेत तिथेच तुम्हाला आयपीएल पाहायला मिळू शकते. 2008 ते 2017 पर्यंत आयपीएलचे Broadcast Rights सोनी कंपनीने 8200 करोडोंमध्य खरेदी केले होते. सोनी कंपनीने दहा वर्षांसाठी 8200 कोटी दिले होते. एका सीझनसाठी 820 करोड मोजले होते. तर 2018 ते 2022 मध्ये स्टार इंडिया कंपनीने पाच वर्षांसाठी 16, 400 कोटींना घेतलेले म्हणजेच एक वर्षासाठी 3,300 कोटी दिले होते. त्यानंतकर आता 2023 ते 2027 पर्यंत Viacom कंपनीने तब्बल 48,390 कोटींना घेतले आहेत. चॅनेलने मोजलेले करोडो रूपये हे बीसीसीआयला अर्धे तर सर्व संघांमध्ये अर्धे दिले जातात. पण इतके पैसे देऊन चॅनेलवाल्यांना काय फायदा? पण ते जर इतके पैसे लावत असतील तर त्यांना रिटर्न म्हणजेच परतावा पण तशा प्रकारचा आहे. कारण आयपीएल सुरू असताना ज्या जाहिराती असतात त्या 10 सेकंदाच्या जाहिरातीचा दर हा लाखांच्या घरात राहतो. स्टार स्पोर्टसवर दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी ब्रंड्सना 15 लाख मोजावे लागत होते. संपूर्ण सीझन या जाहिराती चालवण्यासाठी हा हिशोब केला तर चॅनेल मालकांना त्यांच्या भांडवलासह मजबुत नफा मिळतो.
IPL Broadcast Right Company Name | Broadcast Rights Year | IPL Broadcast Right Amount |
---|---|---|
सोनी कंपनी (Sony Company) | 2008 - 2017 | 8,200 Crore |
स्टार इंडिया कंपनी (Star Sports) | 2018 - 2022 | 16, 400 Crore |
Viacom Company | 2023 - 2027 | 48,390 Crore |
आयपीएलमध्ये Broadcast Rights नंतर सर्वाधिक पैसा टायटल स्पॉन्सरमधून मिळतो. टायटल स्पॉन्सर म्हणजे नेमकं काय? आयपीएल सुरू असताना समालोचक फक्त आयपीएल नाहीतर आधी या कंपनीचं नाव घेतलं जातं. आयपीएल सुरू झाल्यावर पहिल्या पाच वर्षांसाठी म्हणजेच 2008 ते 2012 मध्ये DLF कंपनीने प्रत्येक वर्षाला 40 करोड, 2013 ते 2015 मध्ये तीन वर्षांसाठी पेपसी Pepsi कंपनीने प्रत्येक वर्षाला 79 करोड, त्यानंतर 2016 ते 2017 मध्ये चायना कंपनी Vivo ने प्रत्येक वर्षाला 100 करोड त्यानंतर Vivo कंपनीने 2018 आणि 2019 साठी 440 कोटी एका- एका वर्षासाठी, 2020 मध्ये Dream 11 कंपनीने 222 करोड त्यानंतर परत 2021 मध्ये Vivo कंपनीने 440 कोटी लावले होते. त्यानंतर 2022-23 साठी टाटा कंपनीने 330 कोटी प्रत्येकी वर्षाला लावले होते. त्यानंतरही 2024 ते 2028 पर्यंत टाटाने 2500 हजार कोटींना टायटल स्पॉन्सरशीप घेतली आहे. म्हणजे एका वर्षासाठी टाटा कंपनीने 500 कोटी लावले आहेत. टायटल स्पॉन्सरमधून मिळणारा पैसा बीसीसीआयला अर्धा आणि बाकी टीम्सना अर्धा मिळतो.
IPL Title Sponsors | IPL Title Sponsors Year | IPL Title Sponsors Prise Per Year |
---|---|---|
DLF Company | 2008 - 2012 | 40 Crore |
Pepsi Company | 2013 - 2015 | 79 Crore |
Vivo Company | 2016 - 2017 | 100 Crore |
Vivo Company | 2018- 2019 | 440 Crore |
Dream 11 | 2020-20 | 222 Crore |
Vivo Company | 2021- 21 | 440 Crore |
TATA Company | 2022 - 2023 | 330 Crore |
TATA Company | 2024 - 2028 | 500 Crore |
आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्याच्या तिकिटाची किंमत होम टीम ठरवते. तिकीटांमधून टीमला जे पैसे मिळतात त्यामधील 80 टक्के घरच्या मैदानावर मॅच असणाऱ्या टीमला भेटतात. तर 20 टक्के पैसे स्टेट क्रिकेट असोसिएशनला मिळतात. आयपीएलमध्ये प्रत्येक टीमचे घरच्या मैदानावर एकूण सात सामने होतात. एका सामन्यात सरासरी 4 कोटी तिकीट विक्रीतून मिळतात. मात्र हे पैसे जो खर्च होतो तो काही यातून भागत नाही. आयपीएलमध्ये मॅच सुरू असताना 2.30 सेकंदाचा Strategic Timeout होतो, तोसुद्धा कंपनीने स्पॉन्सर केलेला असतो. म्हणजे आता टाईमआऊट घेताना CEAT Strategic Timeout असा उल्लैख कॉमेन्टेटर करतात. अशाच प्रकारे पहिल्या सहा ओव्हरमध्ये जो पॉवरप्ले असतो तो आता Cred Powerplay असल्याचं स्क्रिनवर दाखवलं जातं. त्यासोबतच Dream 11 गेमचेंजर म्हणून खेळाडूला गौरवण्यात येतं याचे पैसेही टीमला मिळतात.
आयपीएलमधील काही संघांचे मालक आपल्याच प्रॉडक्टच्या जाहिराती टीममधील खेळाडूंकडून करून घेतात. जिओ कंपनीची जाहिरात मुंबई इंडियन्सचे खेळाडू करताना आपण पाहिलं असेल. सर्व टीमचे मालक आपल्या खेळाडूंकडून दुसऱ्या कंपनीच्याही जाहिराती करून घेतात. त्यानंतर संबंधित ब्रँड्सकडून पैसे टीम मालक घेतात. आयपीएलमधील प्रत्येक सामन्यात स्टम्प, बाऊन्ड्री लाईनवर जाहिरात असतात, त्याचेही टीम्सना पैसे मिळतात. यासोबतच प्रत्येक संघाची जर्सी तुम्ही बारकाईने पाहा. टी-शर्टवर सहा, पॅन्टवर दोन आणि टोपीवर दोन असे सरासरी दहा ब्रँड्स दिसतील. हे स्पॉन्सर टीमच्या मालकांना याचे पैसे देतात. जितक्या मॅच तितका फायदा, आता तुम्हाला वाटेल यामध्ये तर कुठेच क्रिकेट नाही आलं. मग विजेतेपद जिंकून काय फायदा? सर्व गोष्टी विजेतेपदावरच अवलंबून असतात.
IPL विजेतेपद जिंकून काय फायदा?
प्रत्येक टीमची एक Brand Value ठरलेली असते. यामध्ये आयपीएलमधील तगडे संघ असतील त्यांची ब्रँड वॅल्यू तशा प्रकारे ठरलेली असते. ही Brand Value कशावरून वाढते? जर एखादा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा जिंकला असेल. तर त्या टीमची Brand Value वाढते. फायनलपर्यंत गेलेल्या टीमची सर्वत्र चर्चा होते त्या टीम्स इतर संघांपेक्षा दोन सामने जास्त खेळतात. फायनल सामना पाहण्याची संख्या वाढलेली असते, त्यावेळी सर्वच ब्रँड्स त्या टीम्सवर पैसा लावण्यासाठी उत्सुक असतात.