‘मला तुझ्याबद्दल….’, जयदेव उनाडकटने जाहीर केला अश्विनने पाठवलेला खासगी मेसेज, काय होत त्यात?

| Updated on: Jan 30, 2022 | 1:46 PM

मागच्या चार-पाच वर्षात भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या चमूमध्ये बरीच प्रगती झाली आहे. वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे जयदेव उनाडकट (Jaidev Unadkat) सारखे वेगवान गोलंदाज अजूनही संधीच्या प्रतिक्षेत आहेत.

मला तुझ्याबद्दल...., जयदेव उनाडकटने जाहीर केला अश्विनने पाठवलेला खासगी मेसेज, काय होत त्यात?
jaidev-ashwin
Follow us on

मुंबई: भारताकडे आजच्या घडीला उत्तम वेगवान गोलंदाजांचा (Pace bowlers) ताफा उपलब्ध आहे. एक वेगवान गोलंदाज जायबंदी झाला, तर त्याची जागा घ्यायला, त्याच तोडीचा दुसरा गोलंदाज तयार असतो. मागच्या चार-पाच वर्षात भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या चमूमध्ये बरीच प्रगती झाली आहे. वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे जयदेव उनाडकट (Jaidev Unadkat) सारखे वेगवान गोलंदाज अजूनही संधीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचा वेटिंगचा कालावधी लांबत चालला आहे. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (Australia tour) टीम मॅनेजमेंटने अनेक युवा गोलंदाजांना संधी दिली, ते पाहून उनाडकला मनोमन वाईट वाटलं. कारण तो त्या गोलंदाजांमध्ये नव्हता.

अश्विनने पाठवला होता मेसेज
2020-21 च्या त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवून नवीन इतिहास रचला. त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या युवा गोलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जयदेव उनाडकटला एक मेसेज पाठवला होता.

काय लिहिलं होतं अश्विनने
इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना उनाडकटने अश्विनने त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्याबद्दल खुलासा केला. “रविचंद्रन अश्विनने त्या मेसेजमधून आपल्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केलं. सकारात्मक विचारांनी मार्गक्रमण करत राहण्याचा सल्ला दिला” “मागच्या रणजी मोसमात तू चांगली कामगिरी केली होतीस. मला तुझ्याबद्दल वाईट वाटलं. तुझी वेळ येईल” असं त्या मेसेजमध्ये लिहिल्याचं उनाडकटने सांगितलं.

मार्च 2018 मध्ये जयदेव उनाडकट भारताकडून बांगलादेश विरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. एक कसोटी, सात वनडे आणि दहा टी-20 सामन्यांमध्ये जयदेव उनाडकटने भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. 2019-20 च्या रणजी मोसमात जयदेव उनाडकटने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. 10 सामन्यात त्याने 67 विकेट घेतल्या होत्या. 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे बोर्डाने रणजी सीजन रद्द केला होता. त्याचा अनेक खेळाडूंना फटका बसला. जयदेव उनाडकट डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आयपीएल स्पर्धेतही तो खेळला आहे.

Jaidev Unadkat Reveals Details Of Ashwin’s Private Text After australia tour