World Cup आधी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात ‘या’ भारतीय खेळाडूची दहशत, मार्नस लाबुशेन याचा मोठा खुलासा!

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. अशातच या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्नस लाबुशेन याने भारताच्या संघातील एका खेळाडूची कांगारूंच्या ताफ्यात दहशत असल्याचं सांगितलं आहे.

World Cup आधी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात या भारतीय खेळाडूची दहशत, मार्नस लाबुशेन याचा मोठा खुलासा!
| Updated on: Oct 01, 2023 | 10:39 AM

मुंबई : र्ल्ड कप 2023 च्या थराराला सुरूवात व्हायला अवघे चार दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यात होणार आहे. भारताच्या वर्ल्ड कप मिशनला 8 ऑक्टोबरला खऱ्या अर्थाने सुरूवात होईल, भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. अशातच या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्नस लाबुशेन याने भारताच्या संघातील एका खेळाडूची कांगारूंच्या ताफ्यात दहशत असल्याचं सांगितलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

ऑस्ट्रेलिया संघाने वन डे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत पाचवेळा नाव कोरलं आहे. आयीसीसीच्या स्पर्धांमध्ये कांगारू संघाने कायम चांगलं प्रदर्शन केलं आहे. यंदाच्या वर्षीसुद्धा कांगारूंचा संघ तगडा असून ते सहज हार मानणार नाहीत. भारतासोबत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना असून त्याआधी लाबुशेन याने एका भारतीय खेळाडूला कांगारूंचा संघ घाबरत असल्याचं म्हटलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे.

काय म्हणाला मार्नस लाबुशेन?

रोहित शर्मा असा खेळाडू आहे जो सहज मोठे शॉट मारून झटपट धावा करू शकतो. एकदा का त्याच्या फॉर्ममध्ये आला की त्याला रोखणं अवघड होऊन जातं, असं लाबुशेन म्हणाला. रोहितने आताच ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वन डे मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 81 धावांची खेळी केली होती. रोहितने कांगारूंच्या गोलंदाजांचा भुगा करत तोडफोड फलंदाजी केली होती.

दरम्यान, रोहित शर्मा याने आतापर्यंत तीन द्विशतके केली असून यामधील एक ऑस्ट्रेलियाविरूद्ध मारलं आहे.  रोहितने आतापर्यंत 251 वन डे सामने खेळले असून 10112 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 30 शतके आणि 52 अर्धशतके केली आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतात असल्याने टीम इंडियाचा पराभव करणं कोणत्याही संघासाठी खायची गोष्ट नाही. भारतीय संघानेही मजबूत तयारी केली असून सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. वर्ल्ड कपमध्ये फक्त पावसाने खोडा नाही घातला पाहिजे नाहीतर वर्ल्ड कपचा थरार राहणार नाही.

Follow Us