
भारतीय कसोटी संघाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका यशस्वीरित्या बरोबरीत राखली. भारताने आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली पहिली मालिका बरोबरीत सोडवली. भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने ड्रॉ केली. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 2007 साली राहुल द्रविड याच्या नेतृत्वात जिंकली होती. तेव्हापासून भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आली नाही. भारतीय संघ यंदा शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही प्रतिक्षा संपवणार का? याकडे लक्ष होतं. मात्र चौथ्या सामन्यानंतर भारतावर मालिका पराभवाची टांगती तलवार होती. मात्र केनिंग्टन ओव्हलमध्ये भारताने या मालिकेतील दुसरा विजय मिळवत इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केला.
भारतीय संघातील बहुतांश खेळाडू या दौऱ्यानंतर मायदेशी परतले आहेत. भारताचा इंग्लंडनंतर बांग्लादेश दौरा नियोजित होता. भारतीय संघ या दौऱ्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार होती. क्रिकेट चाहत्यांना या दौऱ्यानिमित्ताने रोहित शर्मा-विराट कोहली यांना मैदानात पाहण्याची संधी मिळणार होती. मात्र बीसीसीआयने भारताचा हा बांगलादेश दौरा वर्षभरासाठी स्थगित केला. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशिया कप स्पर्धेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताविरूद्धच्या दोन्ही मालिका स्थगित झाल्यानंतरही बांगलादेश चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
नेदरलँड क्रिकेट टीम ऑगस्ट महिन्याच्या शेवटी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. नेदरलँड या मालिकेत 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. उभयसंघात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या टी 20i मालिकेचं आयोजन हे 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. हे तिन्ही सामने एकाच स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड, पहिला सामना, शनिवार 30 ऑगस्ट, सिल्हेट
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड, दुसरा सामना, सोमवार 1 सप्टेंबर, सिल्हेट
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड, तिसरा सामना, बुधवार 3 सप्टेंबर, सिल्हेट
नेदरलँडचा बांगलादेश दौरा
Netherlands and Bangladesh are set to square off later this month in a three-match T20I series 👌#BANvNEDhttps://t.co/4RqJ3K2adk
— ICC (@ICC) August 4, 2025
दरम्यान बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशसाठी ही मालिका तयारीसाठी फायदेशीर ठरणार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.