odisha train accident : मोठ्या मनाचा वीरेंद्र सेहवाग, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी घोषणा

| Updated on: Jun 05, 2023 | 7:47 AM

odisha train accident : तुम्ही सुद्धा वीरेंद्र सेहवागच्या या निर्णयाच कौतुक कराल. सेहवागसारखी उद्योगपती गौतम अदानी यांनी सुद्धा घोषणा केली आहे.

odisha train accident : मोठ्या मनाचा वीरेंद्र सेहवाग, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी घोषणा
Virendra sehwag
Image Credit source: instagram
Follow us on

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी ओदिशाच्या बालासोर येथे भीषण ट्रेन अपघात झाला. देशातील ही सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना आहे. 288 प्रवाशांचा या रेल्वे अपघातात मृत्यू झाला. 900 प्रवासी जखमी झाले. कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरु-हावडा सुपर फास्ट आणि एका मालगाडी दरम्यान शुक्रवारी 2 जूनच्या संध्याकाळी भीषण टक्कर झाली. दोन्ही ट्रेन्सचे अनेक डब्बे रुळावरुन घसरुन पलटी झाले. या भीषण अपघाताची दुश्य पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हळहळला. त्याने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी घोषणा केली आहे.

टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने रविवारी 4 जून रोजी एक घोषणा केली. त्या घोषणेने सर्वांच मन जिंकलं. सेहवागने अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला आपल्या बाजून मदतीचा प्रस्ताव दिलाय. सेहवागने टि्वट करुन ही माहिती दिली.

सेहवागने काय घोषणा केली?

या भीषण रेल्वे अपघाताने अनेक कुटुंब पोरकी झाली आहेत. अनेक मुलं अनाथ झाली आहेत. या भीषण अपघातात ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची तयारी सेहवागने दाखवली आहे. या दु:खद प्रसंगात मी कमीत कमी इतकी मदत करु शकतो, असं सेहवागने त्याच्या टि्वटमध्ये लिहिलय. वीरुने त्याच्या हरियाणा येथील सहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.


अपघातानंतर घटनास्थळी मदतीसाठी पोहोचलेल्या लोकांनाही सेहवागने सलाम केला. स्थानिकांनी जखमींना ट्रेनच्या बोगीमधून बाहेर काढलं व रुग्णालयात पोहोचवलं. अनेकांनी स्वत:हून पुढे येऊन रक्तदान सुद्धा केलं.


गौतम अदानींकडून काय घोषणा?

उद्योगपती गौतम अदानी यांनी सुद्धा सेहवागसारखीच घोषणा केली आहे. या भीषण रेल्वे अपघातात, ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावलं, त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह उचलेल, असं गौतम अदानी यांनी टि्वटमध्ये म्हटलय.

अपघाताची सीबीआय चौकशी?

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घटनास्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली व दोषींना कठोर शासन करण्याचा विश्वास दिला. अपघात झाला, त्या ठिकाणी रविवार संध्याकाळपासून ट्रेनचा प्रवास सुरु झालाय.