IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी तोंडचा घास हिरावला, एक विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज अपयशी, कानपूर कसोटी अनिर्णित

| Updated on: Nov 29, 2021 | 4:57 PM

भारताने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 296 धावांत रोखले. त्यानंतर भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी तोंडचा घास हिरावला, एक विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज अपयशी, कानपूर कसोटी अनिर्णित
Team India
Follow us on

कानपूर : येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला आहे. आज शेवटचा आणि निर्णायक दिवशी उभय संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अवघ्या एका विकेटमुळे भारताच्या हातचा घास हिरावला गेला. काल भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही परदेशी संघाने भारतीय भूमीवर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. न्यूझीलंडलादेखील ते शक्य झाले नाही. मात्र त्यांनी आपला संघ ऑल आऊट होऊ दिला नाही. न्यूझीलंडने आज दिवसअखेर 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला. (Rachin Ravindra, Ajaz Patel’s heroics fight till end, IND vs NZ Kanpur test ends in a draw)

भारताने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 296 धावांत रोखले. त्यानंतर भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खूप मेहनत घेतली. प्रामुख्याने न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत 10 धावांची नाबाद भागीदारी रचत या दोघांनी सामना वाचवला. अखेर अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

कालच्या 1 बाद 4 धावांवरुन पुढे सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आजच्या दिवसातलं पहिलं सत्र गाजवलं. सामन्याच्या पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सामना त्यांच्या बाजूने झुकवला. त्यांनी पहिल्या सत्रात भारताला कोणत्याही प्रकारचं यश मिळू दिलं नाही. टॉम लॅथम (35 – पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत) आणि विल सोमरविले (36) या दोघांनी 76 धावांची नाबाद भागीदारी रचली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. या दोन सत्रांमध्ये भारतीय गोलंदाजांनी 8 बळी घेतले.

रचिन-एजाजने अखेरपर्यंत किल्ला लढवला

न्यूझीलंडकडून या डावात सलामीवीर टॉम लॅथम (52) व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विल सोमरविले (36), केन विलियम्सन (24), रॉस टेलर (2), हेन्री निकोलस (1), टॉम ब्लंडेल (2), काईल जेमिसन (5) आणि टिम साऊथी (4) मैदानात हजेरी लावून परतले. मात्र साऊथी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि एजाज पटेलने पुन्हा विकेट जाऊ दिली नाही. दोघांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि सामना अनिर्णित सोडवला. भारताकडून या डावात रवींद्र जाडेजाने 4, रवीचंद्रन अश्विनने 3, अक्षर पटेलने 1 आणि उमेश यादवने एक विकेट घेतली.

चौथ्या दिवसाची चुरस

भारताची चौथ्या दिवशी डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सकळाच्या सत्रात सुरुवातीला भारताने चेतेश्वर पुजाराची (22) विकेट गमावली. त्यानंतर पाठोपाठ अजिंक्य रहाणेदेखील माघारी परतला. रहाणेनंतर मैदानात आलेला रवींद्र जाडेजादेखील शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 5 बाद 51 अशी झाली होती. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने रवीचंद्रन अश्विनच्या (32) साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनी 6 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या ऋद्धीमान साहाला सोबत घेऊन श्रेयसने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. श्रेयसने या डावात 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर साहा आणि अक्सर पटेलने 8 व्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी केली. या तीन भागीदाऱ्यांच्या जोरावर भारताने 7 बाद 234 धावांवर डाव घोषित केला. साहाने 126 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.

इतर बातम्या

प्रेयसीसोबत अनेक वर्षांची ‘पार्टनरशिप’, मुंबईकर ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरचा साखरपुडा

IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?

‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती

(Rachin Ravindra, Ajaz Patel’s heroics fight till end, IND vs NZ Kanpur test ends in a draw)