आयपीएल फायनलपूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची सुटका, राखीव खेळाडूची शेवटपर्यंत झुंज

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया दोन गटात अमेरिकेसाठी रवाना होणार होती. पण आता आयपीएल फायनलपूर्वीच संपूर्ण संघ सुटला आहे. त्यामुळे 25 मे रोजी संपूर्ण संघ अमेरिकेला रवाना होऊ शकतो. कारण क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थानचा पराभव झाल्याने इतर खेळाडू फ्री झाले आहेत.

आयपीएल फायनलपूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची सुटका, राखीव खेळाडूची शेवटपर्यंत झुंज
| Updated on: May 24, 2024 | 11:44 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने टीम इंडिया दोन गटात अमेरिकेला रवाना होणार होती. मात्र क्वॉलिफायर 2 सामन्यानंतर संपूर्ण संघ यातून सुटला आहे. आज झालेल्या सामन्यातून इतर खेळाडू फ्री झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्याने संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, यशस्वी जयस्वाल आणि आवेश खान मोकळे झाले आहेत. तर एकमेव राखीव खेळाडू अंतिम सामन्यात खेळणार आहे. तो म्हणजे कोलकात्याचा रिंकू सिंह..तसं पण राखीव खेळाडूला संघात स्थान मिळणं कठीण आहे. या व्यतिरिक्त एकही खेळाडू दोन्ही संघात नाही. सनरायझर्स हैदराबादकडून एकाही खेळाडूची टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड झालेली नाही. त्यामुळे रिंकू सिंह हा एकमेव राखीव खेळाडू सोडला तर कोणीच उरत नाही. मोकळ्या झालेल्या खेळाडूंना पण 25 मे रोजी रवाना होणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या गटासोबत जाता येईल. पण आता या खेळाडूंचं नियोजन कसं केलं याबाबत स्पष्टता नाही.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 5 जूनला आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तान, 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडासोबत खेळणार आहे. भारताने 17 वर्षापूर्वी टी20 वर्ल्डकप चषकावर नाव कोरलं होतं. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेत भारताने चषक जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली आहे. मागच्या पर्वात टीम इंडियाचा उपांत्य फेरीत इंग्लंडने 10 विकेट राखून पराभव केला होता.

टीम इंडियात निवड झालेल्या खेळाडूंच्या फॉर्मबाबत आता चिंता सतावत आहे. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे यांनी शेवटच्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्यालाही लय काही सापडताना दिसत नाही. विराट कोहली फॉर्मात आहे, पण त्याच्या एकट्यावर टीमची जबाबदारी असणं कठीण होईल. त्यामुळे टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कसोटी लागणार आहे.

टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि अवेश खान.

Follow Us