Shahid Afridi: ‘मोदी सरकारवर हल्लाबोल’, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्ती स्वीकारल्यानंतरही शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) नेहमी चर्चेत असतो. अलीकडच्या काळात त्याने सातत्याने भारताविरोधात भूमिका घेतली आहे.

Shahid Afridi: मोदी सरकारवर हल्लाबोल, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला
shahid-Afridi
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 16, 2022 | 9:31 AM

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्ती स्वीकारल्यानंतरही शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) नेहमी चर्चेत असतो. अलीकडच्या काळात त्याने सातत्याने भारताविरोधात भूमिका घेतली आहे. पुन्हा एकदा शाहीद आफ्रिदी भारताविरोधात बरळला आहे. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम (Babar Azam) यांच्याबद्दल वक्तव्य केलय. शाहीद आफ्रिदीने यावेळी मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, असं शाहीद आफ्रिदीने म्हटलय. मोदी सरकार आल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले, असं शाहीद आफ्रिदीचं मत आहे.

विराटने उत्तर दिलं असावं, असं वाटतं

“क्रिकेट एक असं माध्यम आहे, ज्यातून दोन्ही देश एकत्र येतात. बाबर आमजने आपल्या कृतीतून जगाला एक सकारात्मक संदेश दिला आहे. विराट कोहलीने सुद्धा बाबर आजमला उत्तर दिलं असावं, असं मला वाटतं” असं आफ्रिदी म्हणाला.

‘ही वेळ ही निघून जाईल’

सध्या खराब फॉर्म मधून जाणाऱ्या विराट कोहलीला बाबर आजमने आपला पाठिंबा दिलाय. काल त्याने विराटसाठी एक खास टि्वट केलं. ‘ही वेळ ही निघून जाईल, मजबूत रहा’ असं त्याने म्हटलय. त्या बद्दल शाहिद आफ्रिदीने बाबरचं कौतुक केलं.

मोदी आल्यानंतर संबंध बिघडले

क्रिकेटच्या पीचवर खेळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचा आता राजकारणात प्रवेश करण्याचा इरादा आहे. त्याने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “मला वाटतं, मोदी सरकार आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडले. याआधी असं नव्हतं, दोन्ही देशात सामान्य संबंध होते” असं आफ्रिदी तिथल्या एका स्थानिक चॅनलवर बोलताना म्हणाला.

भारत-पाकिस्तानमध्ये शेवटची सीरीज कधी झाली?

भारत आणि पाकिस्तान मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये कुठलीही सीरीज झालेली नाही. फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना कोणी घेत नाही.

विराटसाठी खास टि्वट

विराट कोहलीची सध्या खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. ग्रोइनच्या दुखापतीमधून सावरल्यानंतर विराट कोहलीचा दुसऱ्या वनडे मध्ये संघात समावेश करण्यात आला. पण दुसऱ्या वनडेतही विराटची बॅट तळपली नाही. त्याने फक्त 16 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले. याआधी इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीज मध्येही विराट फ्लॉप ठरला. विराट कोहलीवरुन सध्या भारताच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच दोन गट पडलेत. काही जणांना वाटतय की, विराट कोहलीने ब्रेक घेतला पाहिजे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने या कठीण काळात विराट कोहलीसाठी एक खास संदेश पाठवला आहे. बाबर आजमने विराटचं समर्थन केलय. अनेकदा बाबर आजमची विराटशी तुलना केली जाते.