Shoaib Akhtar: ‘विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं’, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा

| Updated on: Jan 23, 2022 | 11:29 AM

कोहलीने, तो एक उत्तम क्रिकेटपटू आहे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी 50 शतक झळकवू शकतो, असं शोएब म्हणाला.

Shoaib Akhtar: विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा
Follow us on

नवी दिल्ली: विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सध्या कठीण काळ सुरु असून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराटची पाठराखण केली आहे. कॅप्टन्सीचा वाद मागे सोडून त्याने विराटला बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. विराट पुन्हा झेप घेईल, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला. “विराट कोहली विरोधात लॉबी कार्यरत आहे. त्यामुळे त्याने भारताच्या वरिष्ठ संघाचं नेतृत्व सोडलं”, असं शोएबने ओमानवरुन स्पोटर्स तकशी बोलताना सांगितलं.

त्याचा राग लोकांवर दिसता कामा नये
शोएब थेट मनापासून बोलण्यासाठी ओळखला जातो. सध्या जे घडतय, त्यामुळे विराट संतप्त होईल. पण त्याचा राग लोकांवर दिसता कामा नये, तो बॅटमधून दिसला पाहिजे असं शोएब म्हणाला. कोहलीने, तो एक उत्तम क्रिकेटपटू आहे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी 50 शतक झळकवू शकतो, असं शोएब म्हणाला.

“विराटसाठी सध्याचा काळ कठीण आहे. मी दुबईत होतो. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने टी-20 वर्ल्डकप जिंकला नाही, तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते, याचा मला अंदाज होता आणि घडलं सुद्धा तसच. त्याच्याविरोधात लॉबीज आहेत. काही लोक त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळेच त्याने कर्णधारपद सोडलं” असं अख्तरने सांगितलं. “विराट कोहलीने स्वत:हून कॅप्टनशिप सोडली नाही. त्याला कर्णधारपद सोडायला भाग पाडलं” असा खळबळजनक दावा शोएब अख्तरने केला आहे.

ज्याला स्टार खेळाडूचा दर्जा मिळतो, त्याला…
“ज्याला स्टार खेळाडूचा दर्जा मिळतो, त्याला समस्यांना सामोर जावं लागतं. पण त्यासाठी घाबरुन जाण्याची गरज नाही. विराटची पत्नी अनुष्का खूप चांगली महिला आहे आणि विराट सुद्धा चांगला मुलगा आहे. त्याने शूर होण्याची गरज आहे, कशाला घाबरुन जाण्याची गरज नाही. संपूर्ण देश त्याच्यावर प्रेम करतो. हा त्याच्यासाठी कठीण काळ आहे. त्याने त्यातून बाहेर यावं” असं शोएब म्हणाला.

मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडलं आहे व वनडेच्या कॅप्टनशिपवरुन त्याला हटवण्यात आलं.

Shoaib Akhtar discusses Virat Kohlis captaincy saga His anger should not be reflected on people but his batting