IND vs SA: भारताच्या पराभवाने खवळले पाकिस्तानी, थेट फिक्सिंगचा आरोप, VIDEO

IND vs SA: विराट कोहलीच्या निष्ठेवर घेतला संशय

IND vs SA: भारताच्या पराभवाने खवळले पाकिस्तानी, थेट फिक्सिंगचा आरोप, VIDEO
team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 31, 2022 | 1:13 PM

पर्थ: टी 20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला हरवलं. या पराभवानंतर टीम इंडियाची ग्रुप 2 मध्ये घसरण झाली आहे. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 5 पॉइंटसह टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाच फार मोठं नुकसान झालेलं नाही. पण पाकिस्तानला फटका बसला आहे. टीम इंडियाच्या पराभवामुळे पाकिस्तानचा सेमीफायनलचा मार्ग अधिक खडतर बनला आहे.

पाकिस्तानच टुर्नामेंटमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयासाठी संपूर्ण पाकिस्तानाता प्रार्थना सुरु होती. पण पाकिस्तानच्या प्रार्थनेचा उपयोग झाला नाही. भारताला या टुर्नामेंटमध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

पाकिस्तानकडून फिक्सिंगचा आरोप

टीम इंडियाच्या या पराभवानंतर पाकिस्तानी फॅन्स भडकले आहेत. पर्थमध्ये स्टेडियम बाहेर त्यांनी आपली नाराजी सुद्धा प्रगट केली. विराट कोहलीच्या हातून काल एडन मार्करामची कॅच सुटली. त्यावर पाकिस्तानी चाहत्यांनी संशय व्यक्त केला आहे. पाकिस्तानने हा सामना फिक्स असल्याच सांगितलं.

गल्लीतली मुलही अशी कॅच सोडत नाहीत

कोहलीने सर्वांनाच चूना लावला, असं पाकिस्तानी फॅन्सच म्हणणं आहे. विराट कोहलीने जी कॅच सोडली, गल्लीत खेळणारी मुलदेखील तशी कॅच सोडत नाहीत. पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी भारताने जाणुनबुजून हा सामना गमावला असं पाकिस्तानी फॅन्सचा आरोप आहे.

भारताचा शानदार खेळ

भारताने टॉस जिंकून पहिली बॅटिंग का स्वीकारली? असा सवालही काही चाहते उपस्थित करतायत. पैसा खर्च करुन आम्ही सामना पाहण्यासाठी आलो होतो, असं एका पाकिस्तानी चाहत्याने म्हटलं. संपूर्ण समाजाला चूना लावला. पाकिस्तानने पुढे जावं, अशी त्यांची इच्छाच नाहीय.