ENG vs IND : जसप्रीत बुमराह दुसऱ्या टेस्टमधून आऊट;कुणाला मिळणार संधी?

England vs India 2nd Test : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 2 ते 6 जुलै दरम्यान एजबेस्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

ENG vs IND : जसप्रीत बुमराह दुसऱ्या टेस्टमधून आऊट;कुणाला मिळणार संधी?
Jasprti Bumrah Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 27, 2025 | 6:07 PM

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाची शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित सुरुवात झाली नाही. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध लीड्समध्ये विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी निर्णायक क्षणी कॅचेस सोडल्या. तसेच जसप्रीत बुमराह याचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताला 5 शतकं केल्यानंतरही पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे.

जसप्रीत बुमराहने पहिल्या सामन्यात एकूण 5 विकेट्स मिळवल्या. मात्र बुमराहला इतर सहकारी गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. बुमराहने या मालिकेआधी 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच बुमराह कोणत्या 3 सामन्यांमध्ये खेळणार हे परिस्थितीनुसार ठरवु, अशी माहिती गंभीरने दिली होती. त्यानुसार आता बुमराह दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी दुसऱ्या कसोटीत कुणाला संधी द्यायची? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल आणि हेड कोच गंभीर हे दोघे कुणाला संधी देणार? याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

दोघांची नावं आघाडीवर

बुमराहच्या एका जागेसाठी 2 गोलंदाजांची नावं चर्चेत आहेत. बुमराहची जागा घेण्यासाठी आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या दोघांची नावं आघाडीवर आहेत. आकाश दीप याने कसोटीत भारताकडून काही सामने खेळले आहेत. तर अर्शदीप अजूनही पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे गिल-गंभीर जोडी कुणाची कुणाची निवड करणार? या प्रश्नाचं उत्तर 2 जुलै रोजीच मिळेल.

बुमराहच्या जागी आकाश दीप?

बीसीसीआय निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करताना बुमराह 3 कसोटी सामनेच खेळणार असल्याचं सांगितलेलं. त्यानंतर बुमराहने इंग्लंडमध्ये गेल्यानंतर 3 सामने खेळणार असल्याचं सांगितलं. बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 3 सामने खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत व्हावं लागेल, असा कुणीही विचारही केला नव्हता. मात्र आता टीम इंडिया पिछाडीवर असूनही बुमराहशिवाय टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करेल? याचा विचारही करवत नाही.

आकाश दीपला संधी मिळणार?

आकाश दीपला 7 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. आकाशने गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तसेच आकाश दीप याने दुखापतीआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीने प्रभावित केलं होतं. आकाशला फर्स्ट क्लास क्रिकेटचाही अनुभव आहे. आकाशने 7 कसोटी सामन्यांमध्ये 38 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आकाशच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 128 विकेट्सची नोंद आहे.

दुसऱ्या बाजूला अर्शदीप सिंह हा डावखुरा गोलंदाज आहे. पहिल्या कसोटीत सर्व उजव्या हाताच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली होती. तसेच अर्शदीपला इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे आता गिल-गंभीर आकाश आणि अर्शदीप दोघांपैकी कुणाला प्राधान्य देणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us