इंग्लंड दौऱ्याआधीच टेन्शन वाढलं, आयपीएलमधील 6 फ्लॉप खेळाडूंना कसोटी संघात मिळाली जागा

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघाच्या निवडीवरून चर्चा रंगली आहे. कारण इंग्लंड दौरा भारतासाठी वाटतो तितका सोपा दौरा नाही. अशा स्थितीत सहा खेळाडूंची झालेली निवड पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.

इंग्लंड दौऱ्याआधीच टेन्शन वाढलं, आयपीएलमधील 6 फ्लॉप खेळाडूंना कसोटी संघात मिळाली जागा
कसोटी संघ
Image Credit source: Sydney Seshibedi/Gallo Images
| Updated on: May 24, 2025 | 8:56 PM

इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी 20 जूनपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात या मालिकेपासून होणार आहे. कसोटी संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर दिली आहे. पण या संघात सहा खेळाडू अशी आहेत. त्यांची आयपीएल 2025 स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाला आहे. तसेच आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यात पंतने 13.72 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत. इतक्या वाईट कामगिरीनंतरही त्याला कसोटी संघात स्थान मिळालं आहे. इतकंच काय तर उपकर्णधारपदही दिलं आहे.

सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा नितीश रेड्डी या पर्वात एकही अर्धशतक ठोकू शकला नाही. त्याने 12 सामन्यात 182 धावा केल्या आणि एकच विकेट घेतली आहे. पण कसोटीत त्याची कामगिरी चांगली आहे. त्याने 5 कसोटीत 37.25 च्या सरासरीने 298 धावा केल्यात

करुण नायरची राष्ट्रीय संघात निवड 8 वर्षानंतर झाली आहे. कसोटीत त्याने त्रिशतक ठोकलं आहे. मात्र 8 वर्षे त्याला संघात काही जागा मिळाली नव्हती. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्याने त्याला संघात स्थान मिळालं. पण आयपीएलच्या सात सामन्यात त्याची फलंदाजी काही खास राहिली नाही. त्याने 22 च्या सरासरीने 154 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याच्या फलंदाजीचा कस लागणार आहे.

वॉशिंग्टन सुंदर हा गुजरात टायटन्सकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे. पण या पर्वात पूर्णपणे फेल गेला आहे. त्याने 5 सामन्यात 85 धावा आणि दोन विकेट घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर कसोटीत 9 सामने खेळला असून त्यात त्याने 468 धावा आणि 25 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या याच कामगिरीसाठी संघात स्थान मिळालं आहे.

वेगवान गोलंदाज आकाश दीपने लखनौ सुपर जायंट्ससाठी एकूण 6 सामने खेळले आहेत. पण या सामन्यात त्याने फक्त तीन विकेट घेतल्या आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सात कसोटी सामन्यात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत.

शार्दुल ठाकुरला आयपीएल मेगा लिलावात भाव मिळाला नव्हता. पण लखनौ सुपर जायंट्स संघात एक गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने त्याची वर्णी लागली. आयपीएलची सुरुवात चांगली झाली. पण नंतर आलेख घसरला. आतापर्यंत 10 सामन्यात त्याने 13 विकेट घेतल्या. दुसरीकडे, शार्दुलने 11 कसोटी सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. आता इंग्लंड दौरा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.

Follow Us