India vs Bangladesh, U19 World Cup: दोन वर्षांपूर्वीच्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी

| Updated on: Jan 29, 2022 | 10:02 AM

ग्रुप स्टेजमध्ये यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ अव्वल स्थानी होता. आता स्पर्धेतील नॉक आऊटची फेरी सुरु झाली आहे. त्यामुळे आता पराभूत होणाऱ्या संघाला पुन्हा संधी मिळणार नाही.

India vs Bangladesh, U19 World Cup: दोन वर्षांपूर्वीच्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी
Follow us on

U19 World Cup: वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या अंडर-19 टीमचा (India under 19 Team) आज बांगलादेशविरुद्ध सामना (India vs Bangladesh) होणार आहे. वर्ल्डकप क्वार्टर फायनलच्या या तिसऱ्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ग्रुप स्टेजमध्ये यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ अव्वल स्थानी होता. आता स्पर्धेतील नॉक आऊटची फेरी सुरु झाली आहे. त्यामुळे आता पराभूत होणाऱ्या संघाला पुन्हा संधी मिळणार नाही. या सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बाब म्हणजे कॅप्टन यश धुलसह संघातील महत्त्वाचे खेळाडू कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. पण त्याचवेळी यश धुलच्या अनुपस्थितीत संघाची धुरा संभाळणारा निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे क्वार्टर फायनलच्या या महत्त्वाच्या सामन्यात निशांत सिंधू खेळणार नाही. त्याच्याजागी अनीश्वर गौतम खेळेल.

त्यावेळी डकवर्थ-लुईस पद्धतीने जिंकला होता वर्ल्डकप
चारवेळच्या अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासमोर गतविजेत्या बांगलादेशचं आव्हान आहे. आजचा सामना जिंकून दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा भारताचा इरादा असेल. आज अँटिग्वा येथे संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरु होईल. बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी नेहमीच वातावरण भावनात्मक होते. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशाने भारताचे तीन विकेट राखून पराभव केला होता. डकवर्थ-लुईस पद्धतीने या सामन्याचा निकाल लागला होता. आपल्या आधीच्या अंडर 19 संघाच्या कामगिरीचा कित्ता गिरवण्याचा विद्यमान बांगलादेशी संघाचा प्रयत्न असेल, त्याचवेळी भारताच्या युवा संघासमोर वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

भारतीय खेळाडू पूर्णपणे फिट?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघातील बहुतांश खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. पण आता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ते खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहेत. दक्षिण आफ्रिकेनंतर भारताच्या अंडर 19 टीमचा आज पुन्हा एकदा एका बलाढ्य संघाविरुद्ध सामना होत आहे.

यापूर्वी आयर्लंड, युगांडा या दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांवर भारतीय संघाने मोठा विजय मिळवला. सिंधू, राज अंगद बावा आणि अंगक्रिष रघुवंशी यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने त्या सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवलं. पण वर्ल्डकपमधील भारताची खरी परीक्षा आजपासून सुरु होणार आहे. त्यांना त्यांच्याच तोडीच्या तुल्यबळ संघांविरुद्ध स्वत:ला सिद्ध करावं लागणार आहे.