आयपीएलच्या 17 व्या पर्वातही आरसीबीच्या पदरी निराशा पडली आहे. 7 पैकी 6 सामने गमवल्याने प्लेऑपच्या आशा धुसर झाल्या आहेत. गणिती भाषेत आताही शक्य असलं तरी तिथपर्यंत पोहोचणं वाटतं तितकं सोपं नाही. जिंकूनही इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांपैकी एक पराभव झाल्यास गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे यंदाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जेतेपदाची झोळी रिकामी राहणार आहे. आरसीबीच्या पराभवाचं विश्लेषण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यानी केलं आहे. नेमकं कुठे चुकतंय यावर दोघांनी बोट ठेवलं आहे. सेहवागने सपोर्ट स्टाफवर बोट ठेवलं तर मनोज तिवारीने लिलावात घडलेल्या चुकांवर प्रकाश टाकला.
“संघात 12-15 खेळाडू भारतीय आहेत. तर 10 विदेशी खेळाडू असतात. असं असताना तुमचा स्टाफ जर विदेशी लोकांनी भरलेला असेल तर समस्या निर्माण होणारच. संघात फक्त काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. बाकीचे सर्व खेळाडू हे भारतीय आहेत. त्यातील अर्ध्यांना तर इंग्रजी ही भाषाही कळत नाही. तर तुम्हीच सांगा त्या खेळाडूंसोबत कोण वेळ घालवेल? त्यांना कोण समजावून सांगेल. खेळाडूंना मानसिक आरामाची गरज असून तीच त्यांना मिळत नाही. खेळाडू फाफसमोर गप्प बसतात. कारण काहीच बोलता येत नाही. पण लीडर भारतीय असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता. पण विदेशी खेळाडूशी वाद घातला तर प्लेइंग 11 बाहेर बसावं लागेल.”, असं माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सांगितलं.
तर माजी क्रिकेट मनोज तिवारीने लिलावाच्या टेबलपासूनच समस्या असल्याचं अधोरेखित केलं. “लिलावात कायम आरसीबी संघाने कच खाल्ली आहे. गोलंदाज निवडताना खूपच चुका केल्या. इतकंच काय तर शिवम दुबे आणि युझवेंद्र चहलसारखे गोलंदाज रिलीज केले. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन या महागड्या खेळाडूंना बेंचवर बसवलं. तुम्ही इतका पैसा खर्च करत असाल आणि उपयोग करून घेता येत नसेल तर काय फायदा? आरसीबीची गोलंदाजी हीच मुख्य समस्या आहे. कधी जॅक्स ओपनिंग गोलंदाजी करतो, तर कधी लोमरार..हे मैदानातील विचित्र निर्णय असतात. त्यामुळे आता इथून पुढे फ्रेंचायसीला दीर्घकालीन योजना आखणं गरजेचं आहे.”