मोठा विजय मिळवून टीम इंडिया Asia cup च्या फायनलमध्ये

विरोधी टीमचा फक्त 74 धावात संपवला खेळ, टीम इंडियाला 7 व्यां दा आशिया कप जिंकण्याची संधी

मोठा विजय मिळवून टीम इंडिया Asia cup च्या फायनलमध्ये
team india
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 13, 2022 | 12:10 PM

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian womens cricket Team) आशिया कपच्या (Asia cup) फायनलमध्ये पोहोचली आहे. सिलहटमध्ये पहिला सेमीफायनल सामना झाला. टीम इंडियाने थायलंडवर मोठा विजय मिळवला. दिप्ती शर्मा (Deepti Sharma) टीम इंडियाच्या विजयाची नायिका ठरली. तिने जबरदस्त गोलंदाजी केली. 4 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट काढल्या. शेफाली वर्माने 28 चेंडूत 42 धावा ठोकल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 36 धावा केल्या.

पीचकडून कोणाला मदत मिळाली?

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 148 धावा केल्या. खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. त्यामुळे भारतीय टीमला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी पीचचा पुरेपूर फायदा उचलला व थायलंडला फक्त 74 धावांवर रोखलं. टीम इंडियाने थायलंडवर 74 धावांनी विजय मिळवला.

मांधना लवकर बाद

टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. स्मृती मांधना फक्त 13 धावांवर आऊट झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने खेळपट्टीवर पाय रोवले. पण ती वेगाने धावा बनवू शकली नाही. तिने 26 चेंडूत 27 धावा केल्या. दुसऱ्याबाजूला शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी केली.

तिने 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. शेफालीने 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. हरमनप्रीतने 30 चेंडूत 36 धावा केल्या. हरमनप्रीत शेवटच्या षटकात वेगाने धावा जमवू शकली नाही.

गोलंदाजांचा जलवा

फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी थायलंडची वाट लावली. पावरप्लेमध्ये दिप्ती शर्माने कमालीची गोलंदाजी केली. तिने 4 ओव्हरमध्ये 7 धावा देऊन 3 विकेट काढल्या. राजेश्वरी गायकवाडने 10 धावा देऊन 2 विकेट काढल्या. रेणुका सिंह, स्नेह राणाने थायलंडच्या फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करु दिली नाही. थायलंडने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 74 धावा केल्या.