Womens Emerging Asia Cup 2023 : भारताच्या श्रेयंका पाटीलची कमाल, समोरची टीम 34 रन्सवर ऑल आऊट

Womens Emerging Asia Cup 2023 मध्ये श्रेयंका पाटिलने जबरदस्त बॉलिंग केली. टीम इंडियाने अवघ्या 32 चेंडूत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी टीमच भारताच्या मुलींसमोर काही चाललच नाही.

Womens Emerging Asia Cup 2023 : भारताच्या श्रेयंका पाटीलची कमाल, समोरची टीम 34 रन्सवर ऑल आऊट
shreyanka patil
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 13, 2023 | 1:43 PM

नवी दिल्ली : भारताच्या मुलींनी वुमेन्स एमर्जिंग आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये कमाल केलीय. इंडिया-ए ने मोंग कॉकमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत यजमान हॉन्ग कॉन्गला अवघ्या 34 रन्सवर ऑल आऊट केलं. भारताकडून लेग स्पिनर श्रेयंका पाटीलने जबरदस्त बॉलिंग केली. श्रेयंकाने अवघ्या 2 धावा देऊन 5 विकेट काढल्या. श्रेयंकाशिवाय पार्श्वी चोपडा आणि मन्नत कश्यपने 2-2 विकेट काढल्या.

इंडिया-ए चा गोलंदाजी परफॉर्मन्स कमालीचा होता. त्यांनी प्रतिस्पर्धी टीमचा डाव अवघ्या 14 ओव्हर्समध्ये संपवला. हॉन्ग कॉन्गच्या फक्त एका बॅट्समनने दोन आकडी धावा केल्या. त्यांचे 4 फलंदाज खातही उघडू शकले नाहीत.

इतकी भेदक गोलंदाजी केली

श्रेयंका पाटिलने या मॅचमध्ये फक्त 3 ओव्हर गोलंदाजी केली. तिने 2 धावा देऊन हॉन्ग कॉन्गचा निम्मा संघ गार केला. श्रेयंकाने पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन आपले इरादे स्पष्ट केले. पाटिलने मारिना लेमप्लॉला बोल्ड केलं. तिची ही मेडन ओव्हर होती. त्यानंतर श्रेयंकाने पुढच्याच ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या.

एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट

हॉन्ग कॉन्गच्या डावात 11 व्या ओव्हरमध्ये श्रेयंकाने हिलला आऊट केलं. पुढच्याच चेंडूवर बेट्टी चैनचा विकेट तिने काढला. पाचव्या चेंडूवर श्रेयंकाने आणखी एक विकेट काढला. तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रेयंकाने पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन आपले पाच विकेट पूर्ण केले. हॉन्ग कॉन्गच्या फलंदाजांना श्रेयंकाची गोलंदाजी कशी खेळायची? तेच कळत नव्हतं.


टीम इंडियाला रोखणं सोपं नाही

हॉन्ग कॉन्गच्या टीमला 34 रन्सवर ऑल आऊट केल्यानंतर टीम इंडियाने आपला विजय निश्चित केला होता. टीम इंडियाने पावरप्ले संपण्याआधीच विजयी लक्ष्य गाठलं. इंडिया ए ने 9 विकेटने मॅच जिंकली. टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी फक्त 32 चेंडू लागले. भारताची कॅप्टन श्वेता सेहरावत फक्त 2 रन्स करुन आऊट झाली, विकेटकीपर छेत्री आणि गोंगादी तृषाने आरामात टीमला विजय मिळवून दिला.

भारताचा पुढचा सामना 15 जूनला नेपाळ विरुद्ध आहे. 17 जूनला पाकिस्तानशी टक्कर होईल. सर्वच फॅन्सना या सामन्याची प्रतिक्षा आहे. फॉर्म पाहून तर टीम इंडियाला रोखणं मुश्किल दिसतय.