IND vs SA : गौतम गंभीर मला दबावाखाली आणतात, पण रोहित, विराट असताना…टीम इंडियाच्या मोठ्या खेळाडूची कबुली, ड्रेसिंग रुमची Inside Story

IND vs SA : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला आहे. पण टीममध्ये सर्वकाही आलबेल नाहीय. हेड कोच गौतम गंभीर यांचं रोहित शर्मा आणि विराट कोहली बरोबर जमत नसल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर एका मोठ्या खेळाडूने आतमधल्या काही गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

IND vs SA : गौतम गंभीर  मला दबावाखाली आणतात, पण रोहित, विराट असताना...टीम इंडियाच्या मोठ्या खेळाडूची कबुली, ड्रेसिंग रुमची Inside Story
Gautam Gambhir-Rohit Virat
Updated on: Dec 03, 2025 | 12:26 PM

सध्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाही आलबेल नाहीय. हेड कोच गौतम गंभीर यांचे विराट कोहली आणि रोहित शर्मा या खेळाडूंबरोबर मतभेद झाल्याच्या बातम्या येत आहेत. आपसात बोलचाल बंद असल्याचं बोललं जात आहे. या दरम्यान आता T20 टीममधील महत्वाचा खेळाडू तिलक वर्माने टीम मधल्या काही गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. माझा आत्मविश्वास वाढवण्यात गौतम गंभीर यांनी महत्वाची भूमिका बजावली. “प्रॅक्टिस सेशनमध्ये गौतम गंभीर नेहमी मला दबावाखाली आणणाऱ्या परिस्थितीमध्ये टाकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कठीण प्रसंगांसाठी मला तयार करणं हा त्यामागे उद्देश असतो” असं तिलक वर्माने सांगितलं.

आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर येथे टीम इंडियाचा दुसरा सामना आहे. “गौतम गंभीर यांनी प्रशिक्षणासाठी ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलय आणि त्यामुळे वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी तयार होण्यात कशी मदत होते” त्याबद्दल तिलक वर्माने सांगितलं. ‘गौतम सर नेहमी मला आत्मविश्वास देतात’ असं वर्मा म्हणाला. “तुझ्याकडे कौशल्य असेल, तर तू सर्व फॉर्मेटमध्ये खेळून उत्तम कामगिरी करु शकतोस असं मला ते सांगतात. प्रॅक्टिस सेशनमध्ये ते मला दबावाखाली आणणाऱ्या सिच्युएशनमध्ये टाकतात. जेणेकरुन दबावाची स्थिती कशी हाताळायची हे मला शिकता येईल. माझ्यामध्ये क्षमता आहे हा त्यांना विश्वास आहे, म्हणून ते मला सतत आव्हानात्मक परिस्थितीत टाकत असतात” असं तिलक वर्मा गौतम गंभीर यांचं कौतुक करताना म्हणाला.

रोहित-विराट टीममध्ये असताना कसं वातावरण असतं?

तिलक वर्माने अजून टेस्टमध्ये डेब्यु केलेला नाही. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने 23 सामन्यात आतापर्यंत 661 रन्स केल्या आहेत. यात चार अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामुळे कसा विकास झाला? या बद्दलही तिलक वर्मा बोलला. भारताचे हे दोन महान खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये असताना त्याच्या उपस्थितीने आत्मविश्वास उंचावतो असं तिलक म्हणाला. ‘रोहित भाई आणि विराट भाई टीममध्ये असताना आत्मविश्वासाची पातळी वेगळीच असते’ असं तिलक वर्मा जियोस्टारशी बोलताना म्हणाला.