मुंबई: ‘कॉफी विथ करण’ या टीव्ही शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे टीम इंडियाचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी दोघांवरही 20-20 लाखांचा दंड सुनावला. महत्त्वाचं म्हणजे दंडाची रक्कम शहीद जवानांच्या पत्नीला देण्यात येणार आहे.
‘भारत के वीर’ या अॅपवरुन 10 जवानांच्या पत्नींना एक-एक लाख रुपये देण्याचे आदेश लोकपालांनी पंड्या आणि राहुलला दिले. याशिवाय या दोघांना अंध क्रिकेटच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलेल्या फंडात 10-10 लाख रुपये देण्यासही बजावलं आहे. जर या दोघांनी चार आठवड्यात हे पैसे दिले नाहीत, तर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंच्या मॅच फीमधील रक्कम कापून घ्यावी, असे निर्देशही लोकपालांनी दिले.
वाचा हार्दिक पंड्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच ही अभिनेत्री भडकली
लोकपाल म्हणाले, “या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची जवळपास 30 लाख रुपयांची कमाई आधीच बुडाली. मात्र क्रिकेटपटू हे देशातील तरुणांचे आदर्श (रोल मॉडल) असतात. त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्यांचं वर्तन आदर्शच असायला हवं”
BCCI Ombudsman directs KL Rahul & Hardik Pandya to pay Rs1,00,000 each to families of 10 constables in para-military forces who have lost their lives on duty & Rs 10,00,000 in the fund created by Cricket Association for the blind,for promotion of game for the blind,within 4 weeks https://t.co/Ju7Zgvwsit
— ANI (@ANI) April 20, 2019
या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली आहे. शिवाय त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची गरज नाही, असं लोकपालांनी नमूद केलं.
वादग्रस्त वक्तव्य
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ मध्ये पंड्या आणि के एल राहुलला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद रॉय यांनी केली होती. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करत त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण वन डे मालिकेतून वगळलं होतं, शिवाय त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही खेळता आले नाही. तसेच ते क्रिकेट विश्वचषक 2019 मधूनही वगळले जाण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेट प्रशासक समितीने त्यांच्यावरील निलंबन मागे घेतल्याने ते विश्वचषकात खेळण्यास मोकळे झाले आहेत. दोघांचीही विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
काय आहे प्रकरण?
हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यावेळी पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’
पंड्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्या या वागणुकीला लज्जास्पद असल्याचं सांगितलं गेलं. पंड्याच्या या वक्तव्याला महिला विरोधी आणि सेक्सिस्ट म्हटले गेले. सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली. यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी केली होती. तर प्रशासक समितीच्या सदस्या डायना एल्डुजी यांनी हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला पुढील कारवाईपर्यंत निलंबित करण्याची शिफारस केली होती.
पंड्या आणि राहुलला बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. ज्यावर त्या दोघांनीही जे काही झाले, त्यावर माफी मागितली होती.
संबंधित बातम्या
पंड्या आणि केएल राहुलवरील निलंबन मागे
पंड्या-राहुल वादावर जेंटलमन द्रविडची प्रतिक्रिया
लाज, शरम आणि अपमान, हार्दिक पंड्या घराबाहेर येईना, फोन उचलेना
हार्दिक पंड्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच ही अभिनेत्री भडकली