Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला अजून किती वाट पाहावी लागणार? गंभीरच्या उत्तराशी तुम्हीही व्हाल सहमत
Gautam Gambhir: अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत वैभव सूर्यवंषशीला संधी मिळाली नाही, आता त्याला आणखी किती वाट पाहावी लागेल असे विचारले असता कोच गौतम गंभीर यांनी काय उत्तर दिले ते पाहा...

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली नाही. तो तिन्ही सामन्यांमध्ये बेंचवरच बसून राहिला. यामुळे अनेक माजी खेळाडूंनी संघ व्यवस्थापनावर टीका केली. भारतीय संघाची या मालिकेत कामगिरी उल्लेखनीय होती, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन दोघांनीही अतिशय छान कामगिरी केली. आता वैभवला संधी का मिळाली नाही यावर प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक विधान केले आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन चांगली फलंदाजी करत नाहीत, तोपर्यंत त्याला वाट पाहावी लागेल. वैभवच्या दृष्टिकोनातून, हे अगदी स्पष्ट होते की त्याला आपल्या संधीसाठी वाट पाहावी लागेल. आम्हाला त्याची प्रतिभा आणि तो काय करू शकतो हे माहीत आहे, पण जो खेळाडू गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहे, तो संघात नुकत्याच सामील झालेल्या खेळाडूच्या नेहमीच पुढे असेल. जेव्हा कधी त्याला संधी मिळेल, तेव्हा ती त्याला दीर्घकाळ मिळत राहील. भारतीय क्रिकेट असेच आहे; आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये स्पर्धा आणि प्रतिभा हवी असते, पण क्रिकेट असेच चालते. तुम्ही १५ वर्षांचे असाल किंवा ३० वर्षांचे, तुम्हाला तुमच्या संधीसाठी वाट पाहावीच लागते.”
प्रशिक्षक गंभीर म्हणाले, “या मालिकेसाठी आम्हाला विश्वचषकातील संघ संयोजनाकडे परत जायचे आहे हे आम्हाला स्पष्टपणे माहित होते. कारण तीन-चार वेळा अपयशी ठरल्यानंतर ते खेळाडू खराब होत नाहीत. आम्ही त्याच प्रकारचा क्रिकेट खेळलो आहोत. जर एखादा संघ एका विश्वचषकातून दुसऱ्या विश्वचषकात न हरता जातो आणि विश्वचषक जिंकतो, तर मला खात्री आहे की तो एक बलाढ्य संघ आहे. एक-दोन मालिकांनंतर ते अचानक खराब संघ बनत नाहीत आणि हे खेळाडूही दोन-तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर खराब होत नाहीत. त्यांनी इथेही तेच दाखवून दिले आहे.”
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने सातत्याने स्फोटक फलंदाजी केली आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर भारतीय संघात संधी मिळाल्यावर त्याने चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्याला संघात स्थान मिळू शकले नाही.