IND vs NZ : न्यूझीलंडचा भारताला व्हाईट वॉश, वन डे मालिका 3-0 ने जिंकली!

| Updated on: Feb 11, 2020 | 5:16 PM

न्यूझीलंडला विजय मिळवण्यात कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम लॅथम यांची भागीदारी निर्णायक ठरली. दोघांनी नाबाद 80 धावांची भागीदारी केली (India Vs New Zealand third One Day).

IND vs NZ : न्यूझीलंडचा भारताला व्हाईट वॉश, वन डे मालिका 3-0 ने जिंकली!
Follow us on

ऑकलंड (न्यूझीलंड) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यातही न्यूझीलंडने टीम इंडियाला धूळ चारत वनडे मालिका 3-0 ने जिंकली. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने दिलेल्या 296 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 5 गडी राखत 47.1 षटकातं पूर्ण केलं (India Vs New Zealand third One Day).

न्यूझीलंडला विजय मिळवण्यात कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम लॅथम यांची भागीदारी निर्णायक ठरली. दोघांनी नाबाद 80 धावांची भागीदारी केली. ग्रँडहोमने आक्रमक खेळी करत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या. तर लॅथमनेही ग्रँडहोमला साथ देत नाबाद 34 चेंडूत 32 धावा केल्या.

टीम इंडियाने दिलेल्या 296 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. मात्र 17 व्या षटकात युजवेंद्र चहलने मार्टिनचा त्रिफळा उडविला.

त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सने निकोलससोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, 22 धावा करुन तो झेलबाद झाला. त्यानंतर रॉस टेलरही 12 धावा करुन तंबूत परतला. रॉस टेलरच्या पाठोपाठ हेन्री निकोलही झेलबाद झाला. त्याने 103 चेंडूत 9 चौकार ठोकत 80 धावा केल्या.

निकोलसच्या विकेटनंतर टीम इंडियाच्या जिंकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, टॉम लॅथमने या आशांवर पाणी फेरलं. त्याने जेम्स निशामसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, निशाम 19 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या कॉलिन डी ग्रँडहोमसोबत त्याने डाव सावरला. ग्रँडहोमने संपूर्ण डाव उलटा फिरवला. त्याने आक्रमक फलंदाजी करच न्यूझीलंडला जिंकून दिलं. त्याने नाबाद 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तर लॅथमने नाबाद 34 चेंडूत 32 धावा केल्या (India Vs New Zealand third One Day).

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. लोकेश राहुलचे शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत 7 बाद 296 धावा केल्या.

टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवर मयांक अग्रवाल फक्त 1 धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीदेखील 9 धावा करुन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने सलामीवीर पृथ्वी शॉसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, 13 व्या षटकांत पृथ्वी शॉ धावबाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकांच्या मदतीने 40 चेंडूत 42 धावा केल्या.

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी डाव सावरला. दोघांनी 100 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने आपलं अर्धशतक साजरी केलं. मात्र, त्यानंतर उंच फटका मारण्याचा नादात तो झेलबाद झाला. त्याने 9 चौकांराच्या मदतीने 63 चेंडूत 62 धावा केल्या.

त्यानंतर लोकेश राहुलला मनिष पांडेनी चांगली साथ मिळाली. दोघांनी 107 धावांची भागीदारी केली. यादरम्यान लोकेशने आपलं शतक साजरी केलं. मात्र, त्यानंतर तो झेलबाद झाला. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 चेंडूत 112 धावा केल्या.

लोकेश पाठोपाठ मनिष पांडेही झेलबाद झाला. त्याने 48 चेंडूत 42 धावा केल्या. त्यानंतर शार्दूल ठाकूर 7 धावा करुन भाद झाला. शेवटच्या षटकांत रविंद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी नाबाद 8 धावा केल्या.