मित्रांनो, आता अलार्म बंद करा, बिनधास्त झोपा : विराट कोहली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

सिडनी: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत […]

मित्रांनो, आता अलार्म बंद करा, बिनधास्त झोपा : विराट कोहली
Follow us on

सिडनी: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. भारताने तब्बल 72 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. चौथ्या सिडनी कसोटीत भारताचा विजय निश्चित होता, मात्र सलग अडीच दिवस पाऊस कोसळल्याने ऑस्ट्रेलिया लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे भारताने कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. तर विराट कोहली हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार बनला. ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान झळकत होता.

कोहली म्हणाला, “सर्वात आधी सांगू इच्छितो की, या टीमचा भाग असणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच मैदानावरुन आमच्या संघात बदलाची प्रक्रिया सुरु झाली. मी कर्णधारपद सांभाळलं आणि चार वर्षांनी या मैदानावर विजय मिळवता आला. या संघाचं नेतृत्त्व करण्याबाबत एकाच शब्दात सांगेन – अभिमान. संघाचं नेतृत्त्व करणं ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे. माझ्या टीममधील मुलांनी कर्णधाराचं काम सोपं केलं”.

पुढे कोहली म्हणाला, “हे माझ्या करियरमधील सर्वात मोठे यश आहे. ही मालिका जिंकल्याने खूपच भावूक आहे. आम्ही 2011 मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा मी संघातील सर्वात युवा खेळाडू होतो. त्यावेळी मी सहकाऱ्यांना भावूक होताना पाहिलं, मात्र तेव्हा मी भावूक झालो नव्हतो. मी ऑस्ट्रेलियाचा तीनवेळा दौरा केला, इथल्या विजयाचं महत्त्व वेगळंच आहे. या विजयाचा आम्हाला अभिमान आहे”.

यावेळी कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि युवा फलंदाज मयांक अग्रवालचं तोंडभरुन कौतुक केलं. आम्ही फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं, छोट्या छोट्या बाबींवर काम केलं. मी पुजाराबाबत विशेष उल्लेख करेन. पुजाराने संपूर्ण मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. तो आपल्या कौशल्यावर सातत्याने काम करत असतो. तो टीममधील जबरदस्त फलंदाज आहे, असं कोहली म्हणाला.

याशिवाय कोहलीने मयांक अग्रवालचं कौतुक केलं. बॉक्सिंग डे कसोटीत मयांकने चॅम्पियनप्रमाणे फलंदाजी केली. तो मैदानावर लढवय्यासारखा उभा राहिला, असं कोहली म्हणाला.

दुसरीकडे कोहलीने गोलंदाजांचीही तोंडभरुन स्तुती केली. गोलंदाजांनी या मालिकेसाठी ज्याप्रकारे तयारी केली, फिटनेसवर लक्ष दिलं आणि विजयाची मानसिकता बनवली ती निश्चितच कौतुकास्पद आहे, असं कोहलीने सांगितलं.

आमचा संघ तरुण आहे, आजचा विजय ही शिखर गाठण्यासाठी महत्त्वाची पायरी आहे. हा विजय शानदार आहे, असं कोहलीने नमूद केलं.

पुढे कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाचंही कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाचा संघही भविष्यात चांगलं काम करेल, असं तो म्हणाला.

या विजयाचा जल्लोष दीर्घकाळापर्यंत करु. आमच्या टीममधील खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या थकले आहेत. आता कोणालाही सकाळी लवकर उठण्यासाठी गजर लावण्याची गरज नाही, असं कोहली म्हणाला. दुसरीकडे कोहलीने प्रेक्षकांचेही आभार मानले.